

Monsoon travel rules in Pune forts
वेल्हे: पावसाळ्यात दुर्घटना होऊ नये, यासाठी राजगड, तोरणा किल्ल्यासह पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरण परिसर, मढे घाट धबधबा तसेच राजगड तालुक्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवरील धोकादायक ठिकाणी जाण्यास, सेल्फी काढणे, धबधब्यावर साहसी क्रीडा आदींना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, गडकोटांसह पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांना मनाई नाही, अशी माहिती राजगड तालुका प्रशासनाने दिली.
दि. 22 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनाला गडकोटांसह पर्यटनस्थळांवर जाण्यास प्रशासनाने मनाई केली असल्याचे जाहीर पत्रक प्रशासनाने काढले होते. त्याप्रमाणे गडकोटांच्या मार्गावर गडावर जाण्यास ‘पर्यटकांना प्रतिबंध’ असे फलक देखील लावण्यात आले आहेत. (Latest Pune News)
पुरातत्व खात्याचे पहारेकरी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे सुरक्षारक्षक गडाच्या पायथ्याला पहारा देत आहेत. मनाई असली तरी राजगड, तोरणा किल्ल्यावर सुटीला हजारो पर्यटक गर्दी करीत आहेत.
धो-धो पावसात पावसाळी पर्यटनाचा आनंद साजरा करण्यासाठी येणार्या पर्यटकांच्या गर्दीने गडकोट, धरण परिसर शनिवारी, रविवारी फुलून जात आहे. इतर दिवशीही पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे हॉटेल, लॉजिंग, रिसॉर्ट, ढाबे हाऊसफुल्लझाले आहेत.
रायगड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील केळद (ता. राजगड) येथील मढे घाट धबधब्यावर रॅपलिंग, साहसी क्रीडा खेळांना तसेच धरणात बोटिंग, जंगलात वनसफारी करण्यास प्रतिबंध आहे. असे असले तरी मढे घाट धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची सुचीच्या दिवशी गर्दी होत आहे.
जोरदार पाऊस पडत असल्याने गडकोटांच्या उंच कड्यांवरील निसरड्या वाटेवरून ये-जा करताना पर्यटकांनी सावधानता बाळगावी. हुल्लडबाजी टाळावी. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी.
- ज्ञानदीप धिवार,पोलिस अंमलदार, वेल्हे पोलिस ठाणे