

पुणे : यंदा एप्रिलपासून ला-निनाची स्थिती निवळत असून अल-निनो सक्रिय होत आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात म्हणजे जून ते ऑगस्टपर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. तसेच मराठी पंचांगातदेखील हाच अंदाज देण्यात आला आहे. खरीप पिकांना ताण पडणार असला तरी सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये ती कसर पाऊस भरून काढणार असल्याने रब्बी पिके चांगली येतील, असेही अंदाजात म्हटले आहे.
यंदा एप्रिलअखेर अल-निनोची स्थिती सक्रिय होत असल्याने आगामी पावसाळ्यात कमी पावसाचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे राज्य शासन देखील पाण्याचे नियोजन करीत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात काही दिवसांपूर्वी दिली होती.
गुढीपाडव्यापासून नवीन मराठी वर्षाला सुरुवात होते. त्यानिमित्ताने पंचांगाची खरेदी होते. यात वर्षभराचे फल म्हणजेच भाकीत दर्शवलेले असते. यंदाच्या दाते पंचांगातही कमी पावसाचे भाकीत दिले आहे. वर्षा ऋतूत कमी पाऊसमान राहील. त्यामुळे खरीप पिकांना पाण्याची ओढ बसेल. मात्र पावसाळा संपताना जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी पिके चांगली येतील, असेही अंदाजात म्हटले आहे.