

पुणे : जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्थांची क्रमवारी ठरविणाऱ्या क्यूएस क्रमवारीतून भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेचा चढता आलेख ठसठशीतपणे अधोरेखित झाला आहे. क्यूएसने बुधवारी जाहीर केलेल्या विषयानुरूप शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीमध्ये भारतातील सहा संस्थांचा नामांकित संस्थांच्या यादीत समावेश झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी खरगपूर आणि आयआयटी मद्रास, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी (बिट्स पिलानी) यांचा समावेश झाला आहे.
लंडनस्थित क्यूएस क्वाकरेल्ली सायमंड्स ही संस्था दरवर्षी जगभरातील उच्चशिक्षण संस्थांचे गुणांकन आणि मूल्यांकन करते. त्यानुसार या संस्थेने 16व्या वार्षिक क्रमवारीमध्ये जगभरातील 100हून अधिक देशांतील सुमारे 1900 विद्यापीठांमधील 21 हजारांहून अधिक अभ्यासक्रमांचे मूल्यमापन केले. यामध्ये 55 विषय आणि पाच प्रमुख शैक्षणिक क्षेत्रांचा समावेश आहे. यंदाच्या क्रमवारीत भारताने विविध विषयांमध्ये तब्बल 27 वेळा पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवले असून, ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे.
विशेष म्हणजे, ही कामगिरी देशातील 12 संस्थांनी साध्य केली आहे. या यादीत आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी खरगपूर आणि आयआयटी मद्रास यांसारख्या अग््रागण्य आयआयटींचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली आणि मुंबई यांनी सहा विषयांमध्ये पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवत सर्वाधिक सर्वसमावेशक कामगिरी नोंदवली आहे.
केमिकल इंजिनीअरिंगमध्ये प्रथमच पहिल्या 50 मध्ये प्रवेश, तसेच आयआयटी दिल्लीने केमिकल इंजिनीअरिंग (48वा), इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग (36वा), मेकॅनिकल, एरोनॉटिकल अँड मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरिंग (44वा) आणि इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (36वा) या विषयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच कॉम्प्युटर सायन्समध्ये 45 व्या क्रमांकासह आयआयटी दिल्लीने देशात दुसरे स्थान पटकावले आहे.