

पौड : मुळशी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका पुणे कोलाड महामार्गाला बसला आहे. ताम्हिणी घाट माथ्यावर झालेल्या मुसळधार पाऊसाने प्रथमच पळसे ते डोंगरवाडी दरम्यान तीन ते चार ठिकाणी रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे.
डोंगरवाडीजवळ पाणी रस्त्यावर आल्याने याठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली होती. तर पळसे धबधबा या ठिकाणी रस्त्याच्या वरून पाणी गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भराव वाहून गेल्याने रस्ता धोकादायक झाला आहे.तर ताम्हिणी ते दावडी दरम्यान डोंगरावर केलेले उत्खननामुळे मातीचा ढिग थेट रस्त्यावर आला आहे.
मुळशीचे तहसिलदार विजयकुमार चोबे, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सदर धोकादायक ठिकाणाची पाहणी करत पुढील काही दिवस ताम्हिणी घाटमार्गे कोकणात जाणारी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पौड आणि माले याठिकाणी तपासणी नाका लावण्यात आलेले आहेत. कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी ताम्हिणी घाटाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहन तहसिलदार विजयकुमार चोबे आणि पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केले आहे.