

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचा पुणे येथील भवानी पेठ मंदिर मुक्कामाबाबतचा निर्णय लांबणीवर पडला असून मुक्काम इतरत्र हलविणे वा सध्याच्या जागेतील उपाय योजनांबाबत ठोस अधिकृत हमी देणारा प्रस्ताव कोणाकडून आला नसल्याचे सांगत आळंदी देवस्थानने याबाबतचा निर्णय पुढे ढकलला आहे.येत्या १ मे रोजी यावर अधिकृत निर्णय घेऊ असे देवस्थानने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हंटले आहे.
देवस्थानने भवानी पेठ मुक्काम ठिकाणी सोयी,सुविधांबाबत तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी,भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर विश्वस्त यांच्याशी बैठक पार पडली त्यात योग्य त्या उपाय योजना देवस्थान तर्फे सुचविण्यात आल्या आहेत.
मात्र १२ एप्रिल पर्यंत मुक्कामाबाबत कोणताही ठोस अधिकृत हमी देणारा प्रस्ताव कोणाकडूनही आलेला नाही. त्यामळे संस्थान कमिटीला पालखी सोहळा समाजाला कोणतीही खात्री तुर्तास देता येणार नाही.
प्रशासन, लोकप्रतिनिधी, भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिर विश्वस्त, दिंडी संघटना पदाधिकारी, श्रीगरू हैबतरावबाबा यांचे वंशज प्रतिनिधी,श्रीमंत उर्जितसिंह शितोळेसरकार मानकरी,सेवेकरी व संस्थान विश्वस्त यांची संयुक्त बैठक प्रशासनाच्यावतीने पूढील ८ दिवसांत आयोजित करण्यात येणार आहे. सदर बैठकीत चर्चेअंती सूविधा व उपाययोजनाबाबत अधिकृत प्रस्ताव प्राप्त झालेनंतर पालखी सोहळा दिंडी समाजाच्यापूढे हा प्रस्ताव २६ एप्रिल रोजी पंढरपूर मुक्कामी चर्चेला ठेवण्यात येईल.तदनंतर दि.१ मे रोजी आळंदी येथे आषाढीवारीची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात येईल अशी माहिती सोहळा प्रमुख ॲड.राजेंद्र उमाप,प्रमुख विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे,विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीर बुवा,विश्वस्त योगी निरंजननाथ,विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील,विश्वस्त ॲड.रोहिणी पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
आळंदी देवस्थान तर्फे पालखी भवानी पेठ मंदिर मुक्कामाबाबत रविवारी (दि.१२) रोजी निर्णय घेण्यात येणार होता व त्यानंतर अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार होते.मात्र सदर निर्णय लांबल्याने अधिकृत मुक्काम नमूद करून प्रिंट स्वरूपातील वेळापत्रक जाहीर करण्यास वेळ लागणार असून पुणे मुक्कामाचा वेळापत्रकावर परिणाम दिसून येत आहे.