

नानगाव : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात आणि डोंगरभागात काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
दरम्यान, भीमा नदीचे ओसरलेले पाणी पुन्हा वाढल्याने आज, बुधवारी (दि. ८) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नानगाव-वडगाव रासाई पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला. दोन दिवसांत दुसऱ्यांदा नदीची पातळी वाढल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा जोर वाढल्यामुळे धरण क्षेत्रातून आणि डोंगरभागातून मोठ्या प्रमाणावर पाणी नद्यांमध्ये येत आहे. परिणामी, नदीच्या पाणीपातळीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. बुधवारी सायंकाळी दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पाणीपातळीत अचानक मोठी वाढ झाली.
अवघ्या दोन दिवसांत दुसऱ्यांदा नदी फुगल्याने नानगाव आणि वडगाव रासाई परिसराचा संपर्क पुन्हा तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.