

पुणे: मॉन्सून सक्रिय न झाल्याने कलिंगड तसेच खरबूज उत्पादक पट्ट्यात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, उत्पादनात घट होऊन गुलटेकडी मार्केट यार्डातील फळांची आवकही घटली आहे. तर, पोषक वातावरणामुळे पपईच्या उत्पादनासह आवकेतही वाढ झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने या फळांच्या भावात किलोमागे चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे.
पुणे विभागात डाळिंब उत्पादक क्षेत्रात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे डाळींबाच्या प्रतवारीत सुधारणा झाली आहे. याखेरीज, बाजारात डाळींबाची आवकही वाढली आहे. मागणी जास्त असल्याने त्याच्या भावातही किलोमागे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्चा तसेच हिरव्या लिंबाच्या तोडीचे प्रमाण कमी झाल्याने बाजारात दर्जेदार लिंबे दाखल होऊ लागली आहेत.
आवक जावक कायम असल्याने लिंबासह उर्वरित सर्व फळांचे भाव कायम असल्याचे सांगण्यात आले. फळबाजारात रविवारी (दि. २८) लिंबू ९०० ते ९०० गोणी, मोसंबी १५ ते २० टन, संत्रा १ ते २ टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई ३० ते ३५ टेम्पो, कलिंगड ५ ते 6 टेम्पो, खरबूज ४ ते ५ टेम्पो, चिकू ४०० गोणी, पेरु ५०० ते ६०० क्रेट, अननस ५ ट्रक आणि कर्नाटक आंब्याची प्लॅस्टिक क्रेट ४ हजार इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे:
लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते ८००, मोसंबी : (३ डझन) : ३२०-५८० (४ डझन) : १९०-३००, संत्रा : (१० किलो) : ४००-१०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ८०-३००, आरक्ता : १०-६०, गणेश : १०-३०, कलिंगड : १५-२५, खरबूज : ३०-४५, पपई : १२-२०, चिक्कू (दहा किलो) : 3००-१०००, पेरु (२० किलो) : २५०-४००, अननस (१ डझन) : १००-६००,
आंबा : कर्नाटक लालबाग (एक किलो) २० ते ३०, बदाम (एक किलो) २० ते ३०, तोतापुरी १५ ते २०, निलम २० ते ३०. प्लम (२ किलो) : ४५०-५५०, पीच (७ ते ८ किलो) : ८००-१०००, चेरी (१ किलो) : ४००-५००, जांभूळ (१ किलो) : ८० ते २००.