

पुणे : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे व काही भागांत झालेल्या गारपिटीमुळे मागील दोन ते तीन दिवसांत रब्बी हंगामातील काढणीच्या अवस्थेतील गहू आणि हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय कांदा, भाजीपाला, फुलपिके आणि फळबागा मिळून एकूण 844 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान पुरंदर तालुक्यात झाल्याचेही त्यांनी सांगितले.
विजेच्या कडकडासह काही भागांत गारांसह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. विशेषतः काढणीच्या अवस्थेतील गहू, हरभरा पिकास याचा फटका बसला आहे. गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला, काकडी, फुलपिके, चारापिके, डाळिंब, कलिंगड, केळी बागांचे नुकसान झाले आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास भाजीपाला आणि फळबागांना आणखी फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाधित तालुका ः क्षेत्र ः नुकसान झालेली पिके
हवेली ः 170 ः गहू, कांदा, भाजीपाला, डाळिंब
राजगड ः 3.70 ः गहू, कांदा, भाजीपाला, काकडी, कलिंगड
दौंड ः 110.20 ः हरभरा, केळी, गहू, कांदा, भाजीपाला, फुले
पुरंदर ः 389.80 ः गहू, कांदा, भाजीपाला, फळ, फुल, चारापिके
शिरूर ः 93 ः गहू, कांदा, भाजीपाला, फळपिके
भोर ः 78 ः गहू, कांदा, भाजीपाला
एकूण 6 तालुके ः 844.70
पुरंदर तालुक्यातील 10 गावांतील 1 हजार 283 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. हवेली तालुक्यातील 12 गावांमधील 390 शेतकरी, राजगडमधील एका गांवात 21 शेतकरी, दौंडमध्ये 4 गावांतील 243 शेतकरी, शिरूरमधील 8 गावांतील 152 शेतकरी, तर भोरमधील 11 गावांतील 258 शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचे प्राप्त स्थानिक अहवालावरून दिसून येत आहे. तर, जिल्ह्यात सहा तालुक्यांतील 46 गांवांमधील एकूण 2 हजार 347 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानग््रास्त पिके व फळबागांचे पंचनामे करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. पावसाची हजेरी कायम राहिल्यास सध्याच्या नुकसानग््रास्त क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.