पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हलगर्जी आणि निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा शौचालयाच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत त्याच्या कुटुंबियांना अकरा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. दिवाणी न्यायाधीश विक्रमसिंग भंडारी यांनी हा आदेश दिला. 9 एप्रिल 2018 रोजी कसबा पेठ परिसरात घडलेल्या घटनेत तुषार बाबु रामोशी या 12 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी, पुणे महानगरपालिका, आयुक्त, बांधकाम व नियंत्रण विभाग व आरोग्य विभागाच्या प्रमुखांविरोधात दावा दाखल करण्यात आला होता.
तुषार याची आई जयश्री रामोश या मोलकरीण तर वडील बाबू उर्फ मानसिंग बिगारी काम करतात. घटनेच्या दिवशी तुषार रात्री साडे आठच्या सुमारास शौचासाठी गेला मात्र बराच वेळ जाऊन तो परतला नाही. त्यानंतर त्यांनी इतरत्र शोध घेतला. शौचालयात जाऊन शोध घेतला असता पाण्याच्या टाकीत तरंगत असल्याचे दिसून आले. त्याला बाहेर काढून दवाखान्यात नेले असता त्याचा पाण्यात बुडाल्यामुळे गुदमरून मत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालातूनही ते स्पष्ट झाल्याने पुणे महापालिका आणि त्यांच्या कर्मचार्यांच्या हलगर्जीपणासह निष्काळजी आणि कर्तव्यात कसूर केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे नमूद करत रामोशी दाम्पत्यांनी अॅड. अमित राठी व अॅड. पूनम मावाणी यांमार्फत न्यायालयात धाव घेतली. त्यांना अॅड. आदित्य जाधव व अॅड. प्राची जोग यांनी सहकार्य केले.
मुलाच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबियांकडून तुषार वर झालेला रुग्णालयाचा खर्च म्हणून 80 हजार रुपये, अंत्यविधीचा खर्च 20 हजार रुपये, मानसिक धक्क्यापोटी 5 लाख रुपये तर कुटुंबियांना सोसाव्या लागलेल्या उत्पन्न ऐवजीच्या नुकसानीची रक्कम 45 लाख रुपये असे एकूण 51 लाख रुपये नुकसान झाल्याचे नमूद केले. मात्र, कुटुंबियांची मुद्रांक शुल्क देण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांनी 11 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी करत त्यावर 12 टक्के व्याज मिळावे म्हणून न्यायालयाकडे मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.
स्वच्छतागृहात बांधलेली टाकी ही शौचालय धुण्यासाठी व पाण्याच्या साठणुकीकरिता बांधण्यात आलेली आहे. ती नागरीकांना पाणी घेऊन शौचालयात जाण्यासाठी बांधण्यात आलेली नाही. नागरिकांनी त्यांच्या घरामधून पाणी घेऊन जाणे व त्याचा शौचावेळी वापर करणे अपेक्षित आहे. पुर्वीपासून नागरीक तसेच करतात. टाकीवरील झाकण खराब अथवा गायब झालेले त्या त्या वेळी ते बसविण्यात आले. रामोशी यांनी कधीही त्याबद्दल लेखी अथवा तोंडी तक्रार केली नाही. बारा वर्षीय मुलाबरोबर पालकांनी जाणेही अपेक्षित होते. घडलेली घटना ही दुर्दैवी असून पालकांच्या दुर्लक्षामुळे ती घडली आहे असा बचाव करत दावा फेटाळण्यात यावा अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आली.
- सार्वजनिक शौचालयांचे ठिकाण हे महापालिकेच्या अखत्यातिरत येते
- तक्रार नसतानाही देखभाल, दुरूस्ती व स्वच्छता राखण्याचे काम महापालिकेचे
- आरोग्य विभागाने स्वच्छतेसाठी पाठपुरावा करून उपाययोजना करणे अपेक्षित
- शौचालयात आकस्मिक घटनेची जबाबदारीसुध्दा महापालिकेवर जाते