

पुणे: येथील कृषी महाविद्यालयातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी चैतन्य चव्हाण यांचा मेसमध्ये विजेचा धक्का लागून निधन झाले. त्याबद्दल संपूर्ण विद्यार्थी वर्गात तीव संताप आणि दुःखाचे वातावरण असून दोषींवर कारवाईसाठी विद्यार्थ्यांनी बुधवारी (दि.25) महाविद्यालयाच्या आवारात शांततेत आंदोलन केले. तर याप्रश्नी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून राहुरी येथील विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सातप्पा खरबडे यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केल्याचे नमूद केले. तसेच पुढील पंधरा दिवसात याप्रश्नी येणाऱ्या अहवालानंतर योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिले. त्यांनतर विद्यार्थ्यांनी आंदोलन तूर्त थांबविले आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, मेसमधील विद्युत यंत्रणा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये गंभीर त्रुटी असूनही महाविद्यालय प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे हा दुर्दैवी प्रसंग घडला. त्याची सखोल, निष्पक्ष चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी व मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत व न्याय मिळावा, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महाविद्यालयातील संबंधित मेसचे हॉटेल व्यवस्थापन हे विद्यार्थीच सहकारी तत्वावर करत आहेत. याप्रश्नी कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी दुपारी महाविद्यालय आवारात येऊन विद्यार्थ्याशी चर्चा करत समिती स्थापन केल्याचे सांगितले असून अहवाल पंधरवड्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच, सायंकाळी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सात्तप्पा खरबडे यांनीही विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडविले जातील, असे सांगितले आहे.
डॉ. महानंद माने, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, पुणे