पुणे : पोलिस भरतीच्या विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन शनिवारी अधिक तीव्र करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. त्यांना साथ मिळाली ती युवक काँग्रेसची. कोरोना काळानंतर गेल्या दोन वर्षांपासून सरकारने पोलिस भरती केली नाही. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुण-तरुणींना एक संधी द्यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे.
२०२२-२३ साली पोलीस भरती झालीच नाही
भरतीसाठी वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांमध्ये नाउमेद
आंदोलनात कॉंग्रेसही सहभागी; रवींद्र धंगेकर रस्त्यावर
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, शनिवारी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला. या वेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांसमवेत रस्त्यावर ठाण मांडले होते. दरम्यान, सरकारने दिलेले आश्वासन पाळले पाहिजे, संधी मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, न्याय द्या, न्याय द्या फडणवीस साहेब न्याय द्या, या घोषणांनी पोलिस भरती तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला.
वयोमर्यादा ओलांडल्याने भरतीपासून वंचित राहिलेल्या तरुण-तरुणींची राज्यभर संख्या जास्त आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तरुणांना फटका बसत आहे. गेल्या दोन वर्षापासून आरक्षणामुळे पोलिस भरती केली नाही. त्यामुळे कित्येक वर्षांपासून भरतीचे तयारी करणार्या अनेक विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा ओलांडले आहे. सध्या सुरु असलेली पोलिस भरती हे 2022-23 मधील आहे. परंतु राज्य सरकारने मुलांचे वय मात्र 2024 पकडले आहे. त्याचा फटका राज्यातील जवळपास विद्यार्थ्यांना बसत आहे.
केवळ सरकारच्या चुकीच्या वय गणना केल्यामुळे विद्यार्थी भरतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला एक संधी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी आंदोलनाद्वारे करत आहेत. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल शिरसाट, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन, उपाध्यक्ष स्वप्निल नाईक, प्रथमेश आबनावे, पुणे शहर युवक सरचिटणीस सुजित गोसावी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकराच्या सुमारास विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. उन्हाचा देखील कहर वाढत होता, उन्हाच्या या तडाख्याने घोषणा देणार्या एका विद्यार्थ्याला भोवळ आली. विद्यार्थी आणि पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
विद्यार्थ्यांच्या मागणीसोबत आम्ही आहोत, याच्यात सरकारने योग्य ते निर्णय घेऊन विद्यार्थी व युवकांना न्याय द्यावा. आम्ही विद्यार्थ्यांसोबत शेवटपर्यंत या लढ्यात सहभागी आहोत. आता तीन महिन्यांवर विधानसभा आल्या असल्याने आम्ही काहीतरी भरती केली हे दाखवण्याच्या नादात लाखो परीक्षार्थींच्या भविष्याशी खेळ होत आहे.
रवींद्र धंगेकर, आमदार