पुणे : परिवर्तन महाशक्तीच्या कोअर कमिटीच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली असून राज्यातील 150 मतदार संघाबाबत एकमत झाले आहे. ज्या-त्या पक्षाचे नेते आपले उमेदवार ठरवतील. त्याचबरोबर राहिलेल्या मतदारसंघांवर लवकरच पुन्हा बैठक घेऊन त्याचा ही तिढा लवकरच सोडवू , अशी माहिती महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि प्रहारचे बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
’परिवर्तन महाशक्ती’ ची २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न झाल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेसाठी छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी, शंकर धोंडगे, वामनराव चटप व समविचारी नेते उपस्थित होते.
यावेळी शेट्टी म्हणाले, समाजातील सर्वसामान्य लोक आज आमच्या सोबत असून प्रस्थापित २०० ते २५० घराणी विरुद्ध सामान्य असा हा लढा आहे. प्रस्थापितांनी कधी सामान्य आश्वासक चेहरा पुढे येऊ दिला नाही. अनेक वर्ष आमची चळवळ काम करत असून सक्षमपणे आम्ही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी ही वेगवेगळे रंगाचे पॅकेज असून ते एकच आहे. स्वच्छ चारित्र्य आणि मतदारसंघाचा विकास यानुसार उमेदवारी दिली जाणार आहे.
बच्चू कडू म्हणाले, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही निवडणुकीस सामोरे जात आहे. भाजप आणि काँग्रेस हे एक सारखेच असून ते धार्मिक राजकारण करत आहे. आम्हाला राज्याचे बजेट हे सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे बजेट करायचे आहे. बजेटमधील ७५ टक्के खर्च अधिकारी आणि राजकारणी यांच्यावर खर्ची होत आहे. कोणता एक झेंडा हाती न घेता आम्ही सर्व जणांना सोबत घेऊन राजकारण करणार आहे. शरद पवार सत्तेत असताना परिवर्तन आणू शकले नाहीत ते आज कसली परिवर्तनाची भाषा करत आहे. आम्ही तिसरी आघाडी नाही तर पहिली आघाडी होऊ.
काँग्रेस आणि स्वराज पक्ष लोकसभा निवडणुकीत एकत्र येऊन कोल्हापूरची जागा स्वराज पक्षासाठी सोडली जाणार होती, असे काँग्रेस हाय कमांडने सांगितले होते. यानंतर माझ्या वडिलांची उमेदवारी पुढे आल्याने मी मुलाचे कर्तव्य पार पाडले, असे छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या सोबत माझे बोलणे झाले आहे, त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. त्यांनी निर्णय लवकर घ्यावा. आमच्या सोबत यावे किंवा त्यांचे उमेदवार उभे करावेत. २० ऑक्टोंबर रोजी त्यांची बैठक आहे त्यात ते निर्णय घेतील.