पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) फळबाग, फुलपीक, वृक्षांची सुमारे 60 हजार हेक्टरवर लागवड करण्याचे उद्दिष्ट सन 2024-25 मध्ये निश्चित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी सर्व विभागीय कृषी सहसंचालकांना दिल्या आहेत.
राज्यात मनरेगातून सलग तीन वर्षे फळबागांखाली अधिकाधिक क्षेत्र आणण्यास कृषी विभागाला यश आले आहे. त्यामध्ये सन 2020-21 मध्ये 38 हजार 225 हेक्टर, 2021-22 मध्ये 43 हजार 889 हेक्टर, 2022-23 मध्ये 40 हजार 93 हेक्टर आणि सन 2023-24 च्या मार्चअखेर 38 हजार 546 हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.
गतवर्ष 2023-24 मधील स्थिती पाहता अमरावती विभागात 88.14 टक्के, नाशिक विभागात 74.53 टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. राज्यात गोंदियासारख्या दुर्गम भागातील जिल्ह्याने 78.76 टक्के फळबाग लागवडीत साध्य केल्याबद्दल तसेच सन 2021-22 ते सन 2022-23 या दोन वर्षांपासून सातत्याने उत्कृष्ट फळबाग लागवड पूर्ण करण्यात राज्यात यश आले आहे. 2024-25 मध्ये करावयाच्या फळझाड लागवडीचे वेळापत्रक क्षेत्रीय स्तरावर पाठविण्यात आले असून, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही डॉ. मोते यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा