नारायणगाव: आळे (ता. जुन्नर) येथील बागायती क्षेत्रात उच्च दाबाच्या 400 केव्हीचे मनोरे उभे करण्यास शेतकर्यांचा विरोध कायम आहे. आळेगावचे शेतकरी आक्रमक पवित्रा घेत असून, ती वाहिनी गावच्या दक्षिणेकडून डोंगराळ भागातून फेरसर्व्हे करून नेण्याबाबत विचार करावा व बागायती क्षेत्रातून काम सुरू करू नये, अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली.
ही बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बोलावली होती. या बैठकीला आ. शरद सोनवणे व माजी आमदार अतुल बेनके उपस्थित होते. तसेच, स्थानिक बाधित शेतकरी संजय गुंजाळ, अॅड. विजय कुर्हाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्ना डोके आदी शेतकरी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी शेतकर्यांच्या वतीने बाजू मांडली. (Latest Pune News)
जिल्हाधिकारी डुडी यांनी या कामास प्रचंड उशीर झालेला आहे. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने काम सुरू करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या असून, ते काम थांबणे अशक्य असल्याचे सांगितले. केवळ मोबदल्याबाबत चर्चा करता येईल, असे त्यांनी सुचविले.
शिवाय तसे पत्र देखील आमदार सोनवणे यांनी दिल्याचे सांगून त्या पत्राचे वाचन देखील केले. माजी आमदार बेनके यांनी या चर्चेत भाग घेतला व मी आमदार असलेल्या काळात हे काम होऊ दिले नव्हते. यावर तत्कालीन जिल्हाधिकारी देशमुख यांचेकडे बैठक घेऊन फेरसर्व्हे करण्याबाबत ठरले होते, त्याचा व्यवस्थित पाठपुरावा झाला नाही.
परंतु, शेतकरी जी मागणी करत आहेत, त्यानुसार उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे हा विषय मांडून फेरसर्व्हेबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. 7) मुंबईत भेट घेऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
आमदार शरद सोनवणे यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा प्रयत्न करावा, असे सूचित केले. पालकमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होईपर्यंत टॉवर उभे केले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.