‘लाडकी बहीण’ योजनेमुळे विरोधक पुरते गोंधळून गेले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होणार, अशी त्यांना खात्री झाल्याचे वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केले आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि जनकल्याण सुशासन’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चास्त्रात डॉ. यादव सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी आंबेगाव येथील शिवसृष्टीला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. यादव यांनी ’लाडकी बहीण’ योजनेवर भाष्य करत विरोधकांवर कोरडे ओढले.
विरोधकांनी सामान्य माणसांसाठी काही केले नाही. आता सरकारने आणलेली ‘लाडकी बहीण’ योजना लोकप्रिय होत असल्याने त्यांचा गोंधळ उडाला आहे. विरोधकांना विधानसभा निवडणुकीतील पराभव दिसू लागला आहे. मी मध्य प्रदेशातून आलो आहे. तेथील जनतेने काँग्रेसला हद्दपार केले आहे. जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला नक्कीच निवडून देतील, असा विश्वास असल्याचे डॉ. यादव म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन अद्वितीय होते. सामान्य व्यक्तींची मोट बांधून महाराजांनी त्यांना संघटित केले. त्यांच्या साथीने जनतेवर अत्याचार करणार्यांना शिवाजी महाराजांनी चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आम्हाला गर्व वाटतो, असे डॉ. यादव म्हणाले.