लोणी धामणी : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाला लोणी (ता. आंबेगाव) येथील शेतकर्यांनी ग्रामसभा घेऊन हरकती घेतल्या आहेत. लोणी गावच्या 200 शेतकर्यांच्या शेतीमधून हा महामार्ग जात असल्याने बरेचसे शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी ग्रामसभा घेत या महामार्गावर हरकती नोंदवून संपादित जमिनींना वाढीव दराने मोबदला देण्यासह विविध मागण्यांचे ठराव करण्यात आले.
ग्रामसभेमध्ये सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब वाळुंज, माजी सरपंच उद्धराव लंके, माजी सरपंच दिलीप वाळुंज, कैलासराव गायकवाड, पोलिस पाटील संदीप आढाव, उपसरपंच प्रकाश गायकवाड, विजय खंडागळे, प्रकाश शिनलकर, सोसायटीचे अध्यक्ष उत्तम आदक, माजी उपसरपंच दिलीप आदक, ग्रामविकास अधिकारी अनिल टेमकर आदींसह ग्रामस्थ आणि महिला
उपस्थित होत्या. लोणी येथील बाधित शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पुणे विभागाच्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके तसेच भूसंपादनाचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांची भेट घेत शेतकर्यांच्या अडीअडचणी मांडल्या होत्या.
तसेच, आंबेगाव-जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडेही बाधित शेतकर्यांना हरकती नोंदविण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर लोणी गावात ग्रामसभा झाली. या ग्रामसभेमध्ये जमिनीचा बाजारभाव वाढवून द्यावा, प्रतिगुंठा दहा लाख रुपये बाजारभाव मिळावा, महामार्गाचा आराखडा दाखवावा, पर्यायी जमीन मिळावी, सरकारने समिती नेमून बाजारभावाची सत्य परिस्थिती जाणून घ्यावी, बाधित शेतकर्यांच्या मुलांना खासगी किंवा सरकारी कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी, रस्त्यालगत बाधित शेतकर्यांना व्यवसायास परवानगी द्यावी, तसेच शेतकर्यांना हरकती घेण्यास मुदत वाढवून द्यावी आदी मागण्यांचे ठराव करण्यात आले. त्याप्रमाणे शेतकर्यांनी हरकत अर्ज तयार केले आहेत.
तसेच मुंबई-गोवा महामार्ग व समृद्धी महामार्गाप्रमाणे शेतकर्यांना जास्तीत जास्त बाजारभाव (भरपाई) मिळावा, अशी मागणी लोणीचे सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक यांनी केली. खासदार, आमदार व राजकीय पदाधिकार्यांनी शेतकर्यांच्या हितासाठी या प्रश्नाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब वाळुंज यांनी केली आहे.
हेही वाचा