

पुणे: प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या मागण्या योग्य आहेत. त्या मागण्यांना आमचे समर्थन आणि मान्यता आहे. दरम्यान शिवसेना पक्षफुटीच्या वेळी बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला होता.
आता ते शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करीत आहेत. तुमच्या पक्षाचे नेते त्यांना भेटत नाहीत, याबाबत विचारले असता प्रत्येक गोष्ट गुवाहाटीशी जोडण्याची काहीच गरज नाही, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ‘मॉडेल स्कूल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ उद्घाटन कार्यक्रम पार पडला, त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. (Latest Pune News)
भुसे म्हणाले, बच्चू कडू यांनी मांडलेल्या 15 पैकी काही मागण्या दिव्यांग कल्याणाशी निगडित आहेत. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना त्यात मार्ग कसा काढता येईल, त्याचा आर्थिक भार किती असेल, याचा सखोल अभ्यास करून पुढे जावे लागेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बच्चू कडूंसोबत चर्चा करण्यासाठी पाठविले होते. तसेच फडणवीसांनी या विषयावर समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक आहे आणि लवकरच यावर निर्णय घेतला जाईल.
महायुती सरकारने अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून शेतकर्यांच्या खात्यावर अनुदान थेट जमा केले जात आहे. शालेय अभ्यासक्रमात हिंदी तिसरी भाषा असण्याच्या सक्तीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
मात्र, याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. याबाबत विचारले असता हिंदीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. जबाबदार कार्यकर्ता म्हणून बोलत असल्याचे सांगून भुसे यांनी यावर जास्त बोलने टाळले