पुणे: महापालिकेत मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे व इतर पदाधिकार्यांनी आयुक्तांच्या बैठकीत घुसून राडा घातलेल्या घटनेचा महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी निषेध केला. दिवसभर काळ्या फिती लावून काम सुरूच ठेवत आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या आवारात अधिकार्यांनी निषेध सभा घेत आंदोलकांवर कारवाईची मागणी गेली, तसेच या पुढे असे प्रकार खवपून घेतले जाणार नाहीत, असा इशारादेखील दिला.
महानगरपालिकेत बुधवारी घडलेल्या घटनेच्या विरोधात गुरुवारी महापालिका कामगार युनियनने काम बंदचा इशारा दिला होता. मात्र, यानंतर अधिकार्यांनी काम बंद न ठेवता प्रतीकात्मक आंदोलक केले. अधिकारी व कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून झालेल्या प्रकाराचा निषेध केला. या वेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विविध विभागप्रमुख, कामगार युनियनच्या अध्यक्षा मुक्ता मनोहर आदींसह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Latest Pune News)
शहर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, आपण जनतेचे मालक आहोत, असा समज झालेली ’पिलावळ’ तयार झाली आहे. पण पुणेकर सुज्ञ आहेत. ते त्यांना त्यांची जागा दाखवतील. तुम्ही वेळीच तुमच्या वागणुकीत सुधारणा करा, असा आमचा या पिलावळीला निर्वाणीचा इशारा आहे. सरकारकडून पुण्यासारख्या शहराला सर्वोत्तम आयुक्त दिले जातात.
त्यांची प्रशासनावर हुकूमत असतेच पण सामाजिक जाणीवही असते. आयुक्त राम हे जिल्हाधिकारी असताना सर्वसामान्यांचे जिल्हाधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्याच पद्धतीने ते पालिकेत काम करत आहेत. पंतप्रधान कार्यालयात त्यांची नियुक्ती झाली होती. अशा सर्वोत्तम अधिकार्याचा आपण शहराच्या विकासासाठी अधिकाधिक उपयोग करून घेतला पाहिजे. परंतु त्यांच्यावर अरेरावी करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.
पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, शांतपणे निवेदन देऊन चर्चा करून मुद्दे मांडता येतात. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तमाशा करणे अत्यंत अयोग्य आहे. असे प्रकार अनेकदा घडले आहेत. अधिकारी शहराच्या विकासासाठीच काम करत असतात. त्यांच्यामुळेच पुणे एकदम चांगले शहर बनले आहे. लोकप्रतिनिधींसाठी आचारसंहिता असलीच पाहिजे. लोकप्रतिनिधींनी आपल्या गैरहितसंबंधांसाठी प्रशासकीय अधिकार्यांवर दबाव आणल्यास हा दबाव झुगारला पाहिजे.
कुणीही यावे आणि अधिकार्यांना काहीही बोलावे, अशी मानसिकता तयार होणे चुकीचे आहे. अधिकारी घरचे नव्हे तर शहराचे काम करतात. आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. आयुक्तांच्या नावातच राम आहे. ते शांत आहेत. पण असे प्रकार घडल्यास आम्ही अरेरावीला अरेरावीनेच उत्तर देऊ, असे परिमंडल उपायुक्त माधव जगताप म्हणाले.
काम बंद न ठेवता केले आंदोलन
मनसे आणि महापालिका आयुक्त यांच्यातील राड्यानंतर महापालिका कर्मचार्यांनी गुरुवारी काम बंद आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र, यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्यांच्या चर्चेनंतर केवळ निषेध करत कामावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. काळ्या फिती लावून काम करण्यात येणार असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.