

पुणे : मान्सूनने पश्चिम राजस्थानातून शनिवारी परतीच्या प्रवासाला प्रारंभ केला आहे. तो तेथून पुढे ३-४ दिवसांत पंजाब, सौराष्ट्र, कच्छच्या भागातून माघारी फिरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २३ सप्टेंबरपर्यंत काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र कोकण, विदर्भात पाऊस कमी झाला आहे.
मान्सून राजस्थानातून माघारी फिरताच बंगालच्या उपसागरातील अंदमानजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे २२ सप्टेंबर रोजी त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यांत रुपांतर होऊन भारतीय किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
असा जाईल मान्सून : १९ ते ३० सप्टेंबर - राजस्थान, पंजाब, गुजरात, जम्मू-काश्मीर, लडाख. ५ ते १० ऑक्टोबर - मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह मध्य आणि पूर्वोत्तर भारत. १० ते १५ ऑक्टोबर - संपूर्ण पश्चिम भारतासह पुढे बंगालचा उपसागर
महाराष्ट्रातून जाण्यास ऑक्टोबर उजाडणार
दरवर्षी साधारणपणे १७ सप्टेंबर रोजी मान्सूनपूर्व राजस्थानातून माघारी जातो. मात्र यंदा तो १९ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. महाराष्ट्रातून जाण्यास ऑक्टोबर उजाडू शकतो. कारण परतीचा मान्सूनदेखील काही ठिकाणी अडखळतो.