

पुणे: मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एकप्रकारे अजित पवार यांच्या अर्थखात्यात घुसखोरी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षातील निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली. आता अजित पवार यांचा नंबर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यापुढे अर्थ खात्याचे सर्व धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय हे मुख्य आर्थिक सल्लागारांच्या रूपाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील.
विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिल्याने त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला असून मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्धतीचा भाग आहे. लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करणे महाराष्ट्राच्या हिताचे राहील.