वक्फ बोर्डाच्या जागांचा बेकायदेशीर व गैरवापर बंद व्हावा, या जागा मुस्लिमांच्या हितासाठीच योग्य पद्धतीने वापरात याव्यात, यासाठीच विधेयक मांडले आहे. मात्र, याद्वारे सरकार मुस्लिमांच्या जमिनी काढून घेणार आहे, असा अपप्रचार काही जण व्यक्त करत आहेत. हा अपप्रचार तातडीने थांबवावा, कोणीही या विधेयकाची चुकीची मांडणी करून नागरिकांची दिशाभूल करू नये, असे स्पष्ट मत केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री किरण रिजिजू यांनी सोमवारी व्यक्त केले.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना रिजिजू म्हणाले, वक्फ कायद्यात बदल व्हावा, जागांचा योग्य वापर व्हावा, यासाठी या कायद्यातील सुधारणांना मुस्लिम समाजातील अनेक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. हे विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीसमोर आहे. त्यावर नागरिकांनी सव्वाकोटींहून अधिक हरकती, सूचना पाठवल्या आहेत, हा एक जागतिक विक्रम आहे. इतक्या हरकती, सूचना येतील, असा विचारही कोणी केला नव्हता. यातील सर्व हरकती, सूचनांची दखल घेतली जाईल, असे रिजिजू यांनी सांगितले.
आतिशी या दिल्लीच्या रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री असतील. केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांचे कर्तव्य बजावता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिकामी ठेवली तर त्याला काहीही अर्थ नाही. केंद्र सरकारची कामगिरी, राज्यातील महायुती सरकारची कामगिरी पाहून महाराष्ट्राची जनता महायुतीलाच पाठिंबा देईल. राज्यात जातीपातीवरून विभाजन करण्याचा प्रयत्न योग्य नाही, असे देखील रिजिजू यांनी स्पष्ट केले.