

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी 2026-2031 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी परिवर्तन उत्कर्ष आघाडी या पॅनलची घोषणा केली आहे. आमच्या पॅनलला नक्कीच बहुमत मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मसापच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाहपदासाठी सुनीताराजे पवार, कोषाध्यक्षपदासाठी विनोद कुलकर्णी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिरीष चिटणीस, अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर, विकास दामोदर पिंगळे, माधव राजगुरू, प्रमोद आडकर आणि डॉ. आशुतोष जावडेकर हे स्थानिक कार्यवाहपदासाठी उभे आहेत. नंदकुमार सावंत, अलका बेडकिहाळ, अमरसिंह पाटणकर (सातारा), पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे, डॉ. श्रुती वडगबाळकर (सोलापूर), दीपक स्वामी (सांगली), राजन मुठाणे (कोल्हापूर), अरुण इंगवले (कोकण), उन्मेश गायधनी , प्रकाश होळकर (नाशिक), जयंत येलूलकर, गणेश भगत (अहिल्यानगर), डॉ. वासुदेव वले, गणेश आढाव (जळगाव), सुरेश देशपांडे, भिकू बारस्कर (ठाणे), इतर उमेदवारांमध्ये राजन लाखे, पुरुषोत्तम काळे, प्रभाकर ओव्हाळ (पुणे जिल्हा), प्राचार्य संजीव गिरासे (धुळे-नंदुरबार) हे उमेदवार निवडणुकीत आहेत.
दहा वर्षांपूर्वी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून मतदारांनी विद्यमान कार्यकारी मंडळाला परिषदेत काम करण्याची संधी दिली होती. परिषदेचा भौतिक विकास करून संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून बौद्धिक समृद्धीत भर घालत परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करीत परिवर्तन आणि उत्कर्ष या कार्यकारी मंडळाने करून दाखविलेला आहे. या निवडणुकीत आम्ही 13 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे आमच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील, याची खात्री आहे, असा विश्वास प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार आणि विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक सध्या खूप चर्चेत असून, निवडणुकीच्या या रिंगणात विद्यमान पदाधिकाऱ्यांचे परिवर्तन उत्कर्ष आघाडी पॅनल आणि साहित्य संवर्धन आघाडी पॅनल आमने-सामने असणार आहे. या दोन्ही पॅनलमध्ये सामना रंगणार असून, दोन्ही पॅनलची निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. दहा वर्षांनंतर मसापच्या निवडणुका होणार असल्याने दोन्ही पॅनलमधील रंगणारा हा सामना साहित्यवर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडी पॅनलसमोर साहित्य संवर्धन आघाडी पॅनल असणार आहे. समविचारी साहित्यप्रेमी एकत्र येत साहित्य संवर्धन आघाडीची स्थापना केली असून, ही आघाडी आगामी निवडणूक लढवणार आहे. परिषदेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने ही आघाडी स्थापन करण्यात आल्याची माहिती पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण यांनी शनिवारी (दि. 24) पत्रकार परिषदेत दिली.
या आघाडीच्या वतीने योगेश सोमण अध्यक्षपदासाठी उमेदवार असून, प्रदीप निफाडकर कोषाध्यक्षपदासाठी, तर स्वाती महाळंक प्रमुख कार्यवाहपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. स्थानिक कार्यवाहपदासाठी सुनील महाजन, शाहीर हेमंत मावळे, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार, कुणाल ओंबासे, नितीन संगमनेरकर आणि गणेश राऊत हे सात उमेदवार रिंगणात आहेत. तर, संदीप तापकीर यांना पुणे जिल्हा प्रतिनिधी या पदासाठी पाठिंबा देण्यात आला आहे. सोमण म्हणाले, दहा वर्षांनंतर ‘मसाप’ची निवडणूक होत आहे. त्यामुळे संस्थेत सकारात्मक बदल होणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निफाडकर म्हणाले, निवडून आल्यावर आम्ही कोणती कामे करणार आहोत, याची सविस्तर माहिती मतदारांना दिली जाईल.
आज अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
आज म्हणजेच रविवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, मंगळवारी (दि. 27) उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.