

पुणे : जून-जुलैच्या सरासरीत मोठी तूट असणाऱ्या मराठवाड्यात ऑगस्टमध्ये अतिवृष्टी होईल, अशी माहिती देशाच्या हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. तसेच, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यातील इतर भागांत मध्यम, तर संपूर्ण देशात सरासरीपेक्षा कमी (९४ टक्के) पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी ३१ जुलै रोजी जाहीर केला.
डॉ. महापात्रा यांनी शुक्रवारी आभासी पत्रकार परिषदेत जुलै महिन्यात झालेल्या पावसाची कारणमीमांसा आणि ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान पडणाऱ्या पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यांनी देशभरातून पत्रकारांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. ते म्हणाले की, देशात जुलैमध्ये सरासरी चांगली असली, तरी पावसाचे वितरण असमान राहिले. तीनच राज्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यात गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. जुलैमध्ये बहुतांश भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहिले.
डॉ. महापात्रा यांनी दिलेली माहिती
- यंदाच्या जुलैमध्ये देशात ४६ टक्के कमी पाऊस झाला, हा १९०१ नंतरचा सर्वांत कमी पाऊस ठरला.
- मात्र काही राज्यांत कमी दाबाच्या पट्ट्यांनी अल निनोवर मात केली. एकूण २४ कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने सर्वाधिक पाऊस ओडिशा, गुजरात आणि महाराष्ट्रात झाला.
- अल-निनो सप्टेंबरअखेर अधिक तीव्र होणार आहे, तर आयओडी त्याच वेळी सकारात्मक होत आहे.
- त्याचा परिणाम म्हणून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये देखील देशात सरासरीपेक्षा कमी (९४ टक्के) पाऊस होईल, असा अंदाज आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज
जून-जुलैमध्ये महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज वर्तविला होता, तरीही जुलैमध्ये खूप पाऊस झाला. या वेळी दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर डॉ. महापात्रा म्हणाले की, कमी दाबाच्या पट्ट्यांनी तीन राज्यांना पाऊस दिला. यात महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरातचा समावेश आहे. अल-निनोचा प्रभाव कमी दाबाच्या पट्ट्यांनी कमी केला. मुंबईपासून सर्वत्र कमी पाऊस होता. तो जुलैमध्ये भरून निघाला. ऑगस्टमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस राहू शकतो. सप्टेंबरमध्येही महाराष्ट्रात मध्यम पाऊस राहील.