

पुणे : जगातील पहिल्या तीन मोठ्या बाजार समित्यांचा अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर जगातील सर्वांत मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती ही मुंबईजवळ सुरू करण्याचा विचार असून, ते शेतमाल व्यापाराचे सर्वांत मोठे हब असेल, अशी माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. तसेच, राज्यातील सोयाबीन खरेदीचा प्रश्न मार्गी लागून लाखो शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. रावल म्हणाले की, मुंबईनजीक होणाऱ्या सर्वांत मोठ्या बाजार समितीत राज्यातील सर्व शेतमाल येईल तसेच तो जगाच्या बाजारपेठेत विकला जाणार आहे. या ठिकाणी जगातील सर्वांत मोठे अन्नधान्य, भाजीपाला आणि फळे व्यापाराचे सर्वांत मोठे हब करण्याचा विचार केला जात आहे. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्ण होईल.
राज्यातील काही जिल्ह्यांत बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सोयाबीन खरेदी रखडली असल्याबाबत रावल यांना विचारले असता ते म्हणाले की, मार्केटिंग फेडरेशन आणि नाफेडची बैठक घेऊन त्यांना सोयाबीन खरेदीस वेग आणण्याबाबतचे सक्त आदेश दिले आहेत. तसेच, बारदाण्याचा तुटवडा दोन ते तीन दिवसांत दूर होऊन तो प्रश्न मार्गी लागेल. तसेच सोयाबीन खरेदीनंतर सात ते दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी काही तक्रारी केल्यास त्या ४८ तासांत मार्गी लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे ते म्हणाले.