![सर्वाधिक जागा महाविकास आघाडीलाच : डॉ. अमोल कोल्हे यांचा दावा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F08%2FAmol-Kolhe-1-696x399-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मंचर : पुढारी वृत्तसेवा : कोणी कितीही पैसे वाटले तरी मतदार भूलणार नाही. कष्टकरी शेतकर्याचा नेहमीच शरदचंद्र पवार अर्थातच महाविकास आघाडीला पाठिंबा असल्याने राज्यात पुन्हा लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाविकास आघाडीलाच मिळणार असल्याचा दावा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी (दि. 13) केला. कळंब (ता. आंबेगाव) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी धावती भेट देऊन कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले. या वेळी खा. डॉ. कोल्हे म्हणाले, जनता पैसे वाटप करणार्या उमेदवाराच्या पाठीमागे न राहता शेतकरी, सर्वसामान्य कष्टकरी यांच्यासाठी झटणार्या शेतकरी कुटुंबातील उमेदवाराच्या पाठीमागे आहे. ते आपल्या मताचे दान देऊन मला पुन्हा एकदा संसदेत पाठवणार यात शंका नसल्याचे खा. डॉ. कोल्हे म्हणाले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव, माजी सरपंच राजश्री भालेराव, प्रदेश सचिव मयूर भालेराव, ऊस बागायतदार सचिन कानडे, युवासेना अध्यक्ष रोहन कानडे, तेजस कानडे, राजकुमार साळवे, माजी सरपंच शरद भालेराव, शांताराम भालेराव, भूषण शिंदे, कुमार भोकसे, युवासेनेचे हर्षल भालेराव, द्राक्ष बागायतदार तुषार कानडे, नीलेश कानडे यांच्यासह आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते. माजी सभापती देवदत्त निकम म्हणाले, शेतकरी व कष्टकरी वर्गामध्ये सत्ताधार्यांच्या विरोधात संतापाची लाट असल्याने मताधिक्य नक्कीच वाढणार आहे.आंबेगाव तालुक्यातून गेल्या वेळेस 25 हजारांचे मताधिक्य डॉ. अमोल कोल्हे यांना होते. या वेळी त्यापेक्षा अधिकचे मताधिक्य कोल्हे यांना मिळेल.
हेही वाचा