

पुणे ः महाराष्ट्रात यशवंतगड नावाने आजवर एकूण दोन किल्ले असल्याचे माहित होते. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीचा यशवंतगड आणि रत्नागिरीचा यशवंतगड. मात्र या दोन गडांव्यतिरिक्त ठाणे प्रांतातील साष्टी येथेही एक यशवंतगड असल्याचा उल्लेख सापडला आहे.
पुणे येथील इतिहास संशोधक राज चंद्रकांत मेमाणे यांना पुणे पुरालेखागारातील मोडी कागदपत्रांतून हा उल्लेख सापडला आहे. मढचा किल्ला म्हणजेच साष्टीचा यशवंतगड असल्याचे ऐतिहासिक मोडी कागदपत्रे तपासली असता हा इतिहास पुढे आला आहे.
संशोधनातील निष्कर्ष....
-इसवी सन १७७० सालातील मोडी कागदपत्रातून किल्ल्यावरील देवस्थानांची यादी दिलेली आहे. ती तपासली असता त्यात श्री हरबादेवी, श्री मुक्तेश्वर, श्री हनुमंत, श्री गणपती यांचा समवेश असल्याचे दिसून आले.
-यापैकी श्री हरबादेवी आणि श्री मुक्तेश्वर ही देवस्थाने आजही किल्ल्याजवळ आहेत.
- मढचा किल्ला पूर्वी साष्टी प्रांतात असल्याचे यापूर्वीच्या प्रकाशित साधनांतून समजून येते.
- ११ फेब्रुवारी इसवी सन १७३९ साली वसईच्या मोहिमेवेळी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मढचा किल्ला घेतला.
-बहुदा त्यानंतरच त्याचे नाव बदलून यशवंतगड ठेवले असावे.
-मोडी कागदपत्रांतून किल्ल्याविषयी जी इतर माहिती मिळते त्यानुसार किल्ल्यात एकूण ३ सदर होत्या. सुभाची सदर, बालेकिल्ल्याची सदर, आणि सरकारवाड्याची सदर.
- किल्ल्याला एकूण ४ दरवाजे असल्याचा उल्लेख येतो. पडकोटचा दरवाजा, चिलखत दरवाजा, बालेकिल्ल्याचा दरवाजा, पडकोटची दिंडी.
- किल्ल्याच्या बुरुजांची नावे ःगणेश बुरुज, भवानी बुरुज, सर्ज्या बुरुज, सूर्या बुरुज, मनरंजन बुरुज, घनचक्र बुरुज.
-याशिवाय किल्ल्यात बंदुका आणि जेंजाला (लांब नळीची तोफ) बनविण्याचा कारखाना असल्याचेही मोडी कागदांतून समजून येते.