Maharashtra Sugar Production: राज्यात 85 ते 96 लाख टन साखर उत्पादनाची अपेक्षा
पुणे : राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी 1 नोव्हेंबरपासून पेटणार, हे मंत्री समितीच्या बैठकीत अंतिम झाले आहे. त्यानुसार यंदाचा हंगाम 2025-26 मध्ये इथेनॉलकडे सुमारे 20 लाख मे. टन साखर जाणार असून, प्रत्यक्षात साखरेचे उत्पादन हे 85 ते 96 लाख मेट्रिक टनाच्या आसपास राहण्याचा संयुक्त अंदाज वर्तविण्यात आला आहे.(Latest Pune News)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 30) मंत्रालयात मंत्री समितीची बैठक झाली. त्यामध्ये प्रभारी साखर आयुक्त दीपक तावरे यांनी साखर उद्योगाचे सादरीकरण केले. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षी एकूण ऊस उपलब्धता, होणारे ऊस गाळप, साखर उत्पादन, सरासरी साखर उतारा याबाबत माहिती देण्यात आली.
राज्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात शेती, फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून जमीनही खरडून जाण्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऊस गाळप हंगाम सुरू करण्यास आता एक महिन्याचा अवधी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात दिवाळीनंतरच ऊस गाळप सुरू होणार असल्याने ऊसतोड मजुरांची उपस्थितीही हंगामाच्या सुरुवातीपासून सुरू राहण्याची अपेक्षा आहे. गतवर्षीचा हंगाम 2024-25 मध्ये सरासरी ऊस गाळपाचे 85 दिवस राहिले आहेत. यंदाच्या 2025-26 च्या हंगामातील उपलब्ध उसाची स्थिती तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याने सरासरी 100 ते 110 दिवस हंगाम राहण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
राज्यात गतवर्षी 2024-25 हंगामात 200 साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले. राज्यात आजअखेर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयस्तरावर 104 सहकारी आणि 107 खासगी मिळून एकूण 211 साखर कारखान्यांनी ऊस गाळप परवाने मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. म्हणजेच गतवर्षीपेक्षा यंदा अधिक कारखाने सुरू होण्याची अपेक्षा आहे. गाळप हंगामाचे धोरण निश्चितीनुसार योग्य त्या रकमा भरल्यानंतर आणि छाननीत परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या साखर कारखान्यांना गाळप परवाने वितरित करण्यात येतील.
दीपक तावरे, साखर आयुक्त, पुणे

