

पुणे : मान्सून केरळममधून अवघ्या २४ तासांत गोव्यापर्यंत आला आहे. शनिवारी पहाटे तळकोकणात येईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. मान्सूनचा प्रचंड वेग पाहता तो पुढील २४ ते ४८ तासांत पुणे आणि मुंबई शहर काबीज करेल असाही अंदाज आहे.
गुरुवारी दुपारी दीड वाजता मान्सून केरळम् मध्ये दाखल झाला. यंदा १ जून ऐवजी तीन दिवस उशिरा ४ जून रोजी आला. एरव्ही तेथून पुढे पाच दिवसांत तो गोवा आणि महाराष्ट्रात येतो. मात्र, यंदा त्याचा वेग प्रचंड असल्याने अवघ्या २४ तासांत त्याने गोवा राज्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे शनिवारी (६ जून) तो तळकोकणसह पुणे आणि मुंबईपर्यंतचा भाग २४ ते ४८ गाठण्याचा अंदाज आहे.
१७ राज्यांना पावसाचा इशारा
मान्सून वेगाने गोव्यापर्यंत आल्याने उत्तर भारतातही तो वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराची शाखा अशा दोन्ही मार्गाने तो देशभरात सक्रिय होत आहे. त्यामुळे शुक्रवारी देशातील १७ राज्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
अशी आहे मान्सूनची स्थिती
-शुक्रवारी मान्सूनने तामिळनाडू आणि गोव्याच्या काही भागांमध्ये प्रवेश केला. -पुढील ७ दिवसांत केरळम् आणि कर्नाटकमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. -बंगालच्या उपसागरातून दुसरी शाखा ईशान्य भारतातही जात आहे. त्या भागातही पढील सात दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील २-३ दिवसांत नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती असून, तो मध्य अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश, गोवा, तामिळनाडू आणि नैऋत्य बंगालचा उपसागर, पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांमध्ये प्रवेश करेल.