

भोर: भाटघर, निरा-देवघर धरणांमधून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्याने धरणांनी तळ घाटला आहे. यामध्ये भाटघर धरणात 10.53, तर निरा-देवघर धरणात 24.12 टक्के पाणीसाठा उरला असल्यामुळे धरणावर असणाऱ्या पाणी योजनांवरील गावांना पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मान्सूनची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
धरणांतून गेल्या तीन महिन्यांपासून होत असल्याने सततच्या पाणी विसर्गामुळे धरणातील पाणीपातळी खालावली असून, धरणाचे बुडीत क्षेत्र कोरडे पडू लागले आहे. 24 टीएमसी एवढी भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता असून, भोर, खंडाळा, पुरंदर, बारामती, इंदापूर, फलटण यांसह सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील शेतीला आणि गावांना या धरणातून पाणीपुरवठा होतो. दुसरीकडे 12 टीएमसी असलेल्या नीरा-देवघर धरणाचे पाणी भोर, खंडाळा, फलटण तालुक्यातील शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी ठरते.
यंदा पाऊस वेळेवर दाखल न झाल्यास धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. धरणांच्या पाणीपातळीत घट झाल्याने धरण क्षेत्रातील काही विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
यंदाच्या उर्वरित पाणीसाठ्यातून पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी पुढील काळात योग्य नियोजन करून धरणात मुबलक पाणीसाठा ठेवण्याची मागणी तालुक्यातील ग््राामस्थांकडून होत आहे.
भोर शहराला दिवसाआड पाणी
भोर शहराला भाटघर धरणातून वर्षभर पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरण क्षेत्रातील पाणीपातळी घटून 10 टक्के म्हणजे अत्यल्प पाणीसाठा उरला असल्याने भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. भोर शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय न करता पाणी वापर करावा, असे आवाहन नगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.