शिवनगर : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद विरुद्ध भावजय यांची रंगतदार लढत सुरू आहे आहे. राज्यासह देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. बारामती तालुक्यामधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी अध्यक्ष आपापसातील मतभेद तसेच राजकीय शत्रूत्व बाजूला ठेवत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील माळेगाव खुर्दमधील प्रचारसभेत एकवटल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकारमहर्षी चंद्रराव तावरे, बाळासाहेब तावरे, विद्यमान अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, रंजन तावरे, जय पवार उपस्थित होते. या वेळी बोलताना चंद्रराव तावरे यांनी केंद्रातील मोदी सरकारने घेतलेले शेतकरी हिताच्या निर्णयाचा शेतकर्यांना झालेल्या फायद्याचा उल्लेख करत विशेषत: सहकारी साखर कारखानदारीच्या द़ृष्टीने मोदी सरकारने अलीकडच्या काळात घेतलेले निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरत असल्याचे सांगून, सध्याच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारच्या अनेक चांगल्या निर्णयांना वेळोवेळी विरोध केल्याचे सांगितले.
तर अजित पवार आणि आमचा उद्देश जनतेचे भले करणे, तसेच गावांचा विकास करून शेतकर्यांना न्याय देण्याचा असल्याने पूर्वीचे शत्रूत्व सोडून आम्ही एकत्र आल्याचे सांगितले. दरम्यान माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी साखर व्यवसायाला उभारी देण्याचे काम नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केल्याचे सांगितले, तर साखरेच्या निश्चित केलेल्या दरामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांना उच्चांकी भाव देऊ शकलो, असे नमूद केले. सहकारी साखर कारखान्यावरील आयकराचा अत्यंत जटिल आणि मोठा प्रश्न अमित शहा यांच्यामार्फत सुटल्याचे तावरे यांनी सांगितले.
या वेळी जय पवार म्हणाले समोरचे विरोधक माझ्याच घरातील असल्याने, मी त्यांच्याविरोधात बोलणार नाही, तथापि अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी घेतला असून अजित पवार हे नेहमीच विकासाच्या मुद्द्यावर ठाम राहिले असल्याचे सांगून सुनेत्रा पवार यांनीदेखील सामाजिक कार्य करताना अनेक महिलांना व्यवसायाला प्रोत्साहित केले असून, महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा सातत्याने प्रयत्न केला असल्याचे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा