

पानशेत धरणखोर्यात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. धरणतीरावरील वरघडमध्ये लक्ष्मण नागू मरगळे यांच्या दोन वर्षांच्या बैलाचा बिबट्याने फडशा पाडला. बिबट्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकर्यांना रानात चरण्यासाठी जनावरे घेऊन जाणे तसेच शेतात काम करणे धोक्याचे बनले आहे.
शेतकरी, जनावरे व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. दरम्यान, वन विभागाने कादवेसह पानशेत धरणखोर्यात खबरदारीसाठी दिवसरात्र गस्त सुरू केली आहे.
गेल्या तीन आठवड्यांत कादवे, आंबेगाव बुद्रुक, पोळेमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या जनावरांची संख्या सात झाली आहे. चार शेळ्यांसह दोन बैल व एक कुत्रा अशा सात जनावरांचा फडशा पाडला आहे.
बिबट्यांच्या दहशतीमुळे एकटेदुकटे गुराखी, शेतकरी रानात जाण्यास घाबरत आहेत. वनक्षेत्रात सायंकाळी सहानंतर सकाळी सहा वाजेपर्यंत पर्यटक तसेच शेतकर्यांनी जाऊ नये. वनक्षेत्रात बिबट्यांसह हिंस्र वन्यप्राण्यांचा अधिवास असल्याने खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
पानशेत विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अंकुश पासलकर म्हणाले, धरण परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा गेल्या दोन महिन्यांपासून वावर वाढला आहे. गुराख्यासमोरच बिबटे जनावरांवर हल्ला करत आहेत. तसेच, गोठ्यातील जनावरांचा फडशा पाडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात यावेत.
कोकणातील रायगड जिल्ह्यालगतच्या सह्याद्रीच्या डोंगररांगा थेट पानशेत सिंहगड किल्ल्यापर्यंत पसरल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील जंगलात बिबटे आहेत. नागरीकरण वाढल्याने नागरी वस्त्यांकडे बिबटे धाव घेत आहेत. डिसेंबर महिन्यात बिबट्यांनी मोठा धुमाकूळ घातला होता. धरण परिसरातील हॉटेल, ढाब्यांवर 31 डिसेंबरच्या पार्ट्यांमुळे स्पीकर तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला.
पानशेत, वरसगाव धरणभागासह सिंहगड किल्ल्याच्या परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. निसर्ग पर्यटनासाठी पर्यटक रात्री ढाबे, हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊसलगतच्या जंगलात भटकंती करत आहेत. बिबट्यांसह हिंस्र वन्यप्राण्यांचा अधिवास वनक्षेत्रात आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी हॉटेलमालक व पर्यटकांना वनक्षेत्रात सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत जाण्यास वन विभागाने शासन आदेशानुसार मनाई केली आहे. याबाबत सूचनाफलक सिंहगड किल्ल्याच्या परिसरात लावण्यात आले आहेत. तसेच पानशेत, वरसगाव धरण परिसरातही लावण्यात यावेत.
देविदास हनमघर, सरपंच, साईव बुद्रुक