

बारामती: पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकर्यांनी सहभागी व्हावे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे, असे आवाहन बारामती तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकर्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. बारामती तालुक्यात आतापर्यंत सरासरी 114 टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तालुक्यात पीकविमा योजना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. खरीप हंगामामील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तूर, मका, कांदा या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकर्यांना भाग घेता येईल. (Latest Pune News)
योजनेत भाग घेण्यासाठी शेतकर्याचा अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकर्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक, सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज भरून सहभागी व्हावे.
याशिवाय सामान्य सुविधा केंद्र (सीएससी), आपले सरकार सुविधा केंद्र येथे किंवा https:/// pmfby. gov. in या पोर्टलवरूनही अर्ज भरता येईल. पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषीरक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक 14447 यावर संपर्क करावा अथवा संबंधित विमा कंपनी, बारामती तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.