

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : राज्यात मूत्रपिंड निकामी होण्याच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यातूनच अवयव प्रत्यारोपणाची गरजही झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत मूत्रपिंडासह विविध अवयवांच्या प्रत्यारोपणांची संख्या दुपटीहून अधिक वाढल्याचे राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे.
राज्यात 2023 मध्ये एकूण 2,792 प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या, तर 2025 मध्ये शस्त्रक्रियांची संख्या 5,022 वर पोहोचली आहे. विशेषतः मूत्रपिंड प्रत्यारोपणात मोठी वाढ दिसून येत आहे. त्यापैकी 2023 मध्ये 634 मूत्रपिंड प्रत्यारोपण संख्या 2025 मध्ये 1,462 वर गेली आहे. यामध्ये जिवंत दाते आणि ब्रेन-डेडदात्यांकडून होणार्या प्रत्यारोपणांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि बदलती जीवनशैली ही मूत्रपिंड निकामी होण्यामागील प्रमुख कारणे आहेत.
यामुळे डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाशिवाय पर्याय उरत नाही. परिणामी, प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीही वाढत आहे. डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात 280 प्रत्यारोपण केंद्रे नोंदणीकृत असून, त्यापैकी 147 बहुअवयव प्रत्यारोपण केंद्रे आहेत. तसेच, 49 केंद्रांना अवयव काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. 1994 च्या मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यामुळे अवयवदान प्रक्रियेला कायदेशीर चौकट मिळाली असून, अवैध व्यापारावरही नियंत्रण ठेवले जात आहे.
कोणते उपाय करावेत?
मधुमेह नियंत्रणात ठेवा
रक्तदाब नियंत्रणात ठेवा
पुरेसे पाणी प्या
मीठ कमी खा
जंक/प्रोसेस्ड अन्न टाळा
वेदनाशामक औषध अतिरेक टाळा
धूम्रपान व मद्यपान टाळा
नियमित किडनी तपासणी करा
वजन नियंत्रणात ठेवा
गेल्या काही वर्षांत मूत्रपिंड निकामी होणार्या रुग्णांची संख्या वाढत असून, प्रत्यारोपणाच्या केसेसही जवळपास दुप्पट झाल्या, ही चिंताजनक बाब आहे. यामागे बदललेली जीवनशैली, ताण, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे नियमित तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करणे आवश्यक आहे.
डॉ. पराग गुल्हाणे, मूत्ररोगतज्ज्ञ, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर