लोणी-धामणी : आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील लोणी परिसरात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्याचे पावसाकडे डोळे लागले आहेत.
यंदा खरिपाच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यात मांदळेवाडी, पहाडदरा, शिरदाळे, लोणी, धामणी, वडगावपीर परिसरात वळवाच्या पावसाने चांगली सुरुवात केली. भरपूर पाऊस पडेल या आशेवर सर्व शेतकर्यांनी मृग नक्षत्रात भुईमूग, बाजरी, मूग, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली होती. परंतु, त्यानंतर आजतागायत पावसाने या भागात दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले आहे.
हा परिसर दुष्काग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. पावसाने चांगली हजेरी लावली, तर या भागात पिके चांगली येतात. चालू वर्षी पावसाने चांगली सुरुवात केली. पण नंतर मात्र दडी मारल्याने या भागातील पिके सुकू लागली आहेत. गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्याने पूर्णपणे खरीप हंगाम वाया गेला होता. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक फटका बसला होता. चालू वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हलबल झाला आहे.
आजही या भागात लोणी, धामणी, मांदळेवाडी येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. अजूनही जनावरांना मुबलक असा चारा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे विकतचा हिरवा चारा जनावरांना आणावा लागत आहे. जर या भागात अशीच पावसाने दडी मारली तर शेतकर्यांच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.