

बारामती: केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम २०२६साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.
योजनेनुसार नोंदणीसाठी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. तसेच पीक नुकसान भरपाईसाठी डिजिटल पीक सर्वेक्षणद्वारे पिकांची नोंद करणे आवश्यक आहे. प्रतिअर्ज किमान ०.१० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. भाडेपट्टीवरील शेतीसाठी नोंदणीकृत भाडेकरार व सामाईक खातेदारांचे संमतीपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
बनावट ७/१२, दुसऱ्याच्या जमिनीवर अथवा अकृषक जमिनीवर पीक विमा काढल्याचे आढळल्यास संबंधित अर्जदारास कृषी विभागाच्या सर्व डीबीटी योजनांमधून पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
बारामती तालुक्यात खरीप हंगामातील कांदा, सोयाबीन, तूर, भुईमूग, मका आणि बाजरी या प्रमुख पिकांसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे. शेतकरी जवळच्या सीएससी केंद्रात, पोस्ट कार्यालयात, बँक शाखेत किंवा क्रॉप इन्शुरन्स पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी कृषी रक्षक हेल्पलाइन १४४४७ वर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.