खडकवासला: खडकवासला धरणसाखळीत चारही धरणक्षेत्रांसह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर शुक्रवारी (दि. 22) सकाळपासून श्रावण सरींचा अपवाद वगळता पावसाने उघडीप दिल्यामुळे धरणसाठ्यातील पाण्याची आवक मंदावली आहे. मुठा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग 3 हजार 312 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. धरणसाखळीत सायंकाळी पाच वाजता 27.66 टीएमसी म्हणजे 94.88 टक्के इतका पाणीसाठा झाला होता.
पाण्याची आवक मंदावल्याने पानशेत आणि वरसगाव धरणांच्या मुख्य सांडव्यातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या दोन्ही धरणांतून वीजनिर्मिती केंद्राच्या सांडव्यातून प्रत्येकी 600 क्युसेक पाणी सोडले जात आहे. टेमघरमधून 1 हजार 573 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. या तिन्ही धरणांतून सोडण्यात येत असलेल्या पाण्याची भर खडकवासला धरणात पडत आहे. (Latest Pune News)
शुक्रवारी सकाळपासून खडकवासला परिसरात पावसाने उघडीप दिली. रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत-वरसगाव खोर्यात रिमझिमसह अधूनमधून श्रावण सरी कोसळत आहेत. उघडीपीनंतर ऊन पडत आहे. त्यामुळे चारही धरणक्षेत्रांत पाण्याची आवक कमी झाली आहे, असे खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी सांगितले. दिवसभरात टेमघर येथे 15, पानशेत येथे 6 आणि वरसगाव येथे 5 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला येथे पावसाची नोंद झाली नाही.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
शुक्रवारचा पाणीसाठा
27.66 टीएमसी (94.88 टक्के)