खडकवासला: चार धरणांच्या खडकवासला धरणसाखळीत गुरुवारी (दि.4) 29.15 टीएमसी म्हणजे शंभर टक्के पाणीसाठा झाला. वरील तिन्ही धरणांतून सोडण्यात येणार्या पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी सहा वाजता खडकवासलाच्या विसर्गात 2 हजार 140 क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली. टेमघर, वरसगाव, पानशेतनंतर खडकवासला देखील तुडुंब भरून वाहू लागले आहे.
खडकवासलातून गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मुठा नदी पात्रात 1 हजार 263 क्युसेकचा विसर्ग सुरू होता. धरण शंभर टक्के भरल्याने विसर्गात वाढ करण्यात आली. दिवसभरात चारही धरणमाथ्यावर पावसाची नोंद झाली नाही. (Latest Pune News)
पानशेत, वरसगाव, टेमघर धरणमाथ्यासह खडकवासला धरणक्षेत्रात पावसाची उघडीप होती. वरसगाव व पानशेत शंभर टक्के भरून वाहू लागल्याने बुधवारी (दि.3) सायंकाळी सहा वाजता खडकवासलातून मुठा नदीपात्रात पुन्हा विसर्ग करण्यात आला.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले, चारही धरणमाथ्यावर पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, पानशेत - वरसगाव धरण खोर्यातील घाटमाथ्यासह डोंगरी पट्ट्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे.
त्यामुळे खडकवासला वगळता इतर धरणात पाण्याची आवक सुरू आहे. ही धरणे शंभर टक्के भरल्याने जादा पाणी खडकवासलात सोडले जात आहे. त्यामुळे खडकवासल्यातील विसर्ग वाढविण्यात आला आहे. वरसगाव धरणातून 1 हजार 344, पानशेत 600 आणि टेमघर धरणातून 509 क्सुसेक पाणी सोडले जात आहे. धरणांतील पाण्याची आवक पाहुन विसर्ग कमी, जादा करण्यात येत आहे.
पानशेत धरणखोर्यातील कुर्तवडी येथील शेतकरी मधुकर कडू म्हणाले की, घाटमाथ्यावर दाट धुके पडले आहे. रिमझिम पाऊसही अधुनमधून पडत आहे. त्यामुळे ओढे- नाल्यांचे प्रवाह सुरू आहेत.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
सोमवारचा पाणीसाठा
29.15 टीएमसी (100 टक्के)