

पुणे: एप्रिल महिन्याची सुरुवात वळीव पावसाने होणार आहे. आज, मंगळवार (1 एप्रिल) पासून शुक्रवार (4 एप्रिल) पर्यंत चार दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह वळीव बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यातील आठ जिल्ह्यांना ‘ऑरेंज’, तर तीस जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये 88 ते 112 टक्के वळीव पडण्याची शक्यता असून, एप्रिल ते जूनदरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असाही अंदाज व्यक्त केला आहे.
हिमालय ते उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे. तामिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील बहुतांश भागात वळवाला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. यात हिमालयापासून ते पूर्वोत्तर भारत, मध्य भारत, मध्य प्रदेश महाराष्ट्र ते दक्षिण भारत असा संपूर्ण देशात वळवाचा प्रभाव 1 ते 4 एप्रिल या कालावधीत राहील. महाराष्ट्रात मात्र 1 ते 2 एप्रिल हे दोन दिवस सावधान राहण्याचे असतील; कारण या कालावधीत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
असे आहेत अलर्ट (कंसात तारखा : 1 ते 4 एप्रिल)
ऑरेंज अलर्ट : पुणे (1, 2), सातारा (2), जळगाव (1), नाशिक (1), अहिल्यानगर (1), छ. संभाजीनगर (1, 2), जालना (1, 2), गोंदिया (2).
यलो अलर्ट : ठाणे (1, 2), रायगड (1, 2), रत्नागिरी (1, 2), सिंधुदुर्ग (1 ते 4), धुळे (2), नंदुरबार (2), जळगाव (2), नाशिक (2), अहिल्यानगर (2), कोल्हापूर (1 ते 4), सातारा (1, 3), सांगली (1 ते 4), छ. संभाजीनगर (1, 3), जालना (3), परभणी (4), बीड (2, 3), नांदेड (4), लातूर (3, 4), धाराशिव (3, 4), अकोला (1, 2), अमरावती (1, 2), भंडारा (1 ते 4), चंद्रपूर (3, 4), गडचिरोली (3, 4), गोंदिया (3, 4), नागपूर (2, 3), वर्धा (3, 4), वाशीम (2, 3), यवतमाळ (3).
असे राहील तीन महिन्यांचे हवामान
एप्रिल ते जूनदरम्यान देशाच्या बहुतेक भागांत सामान्यपेक्षा जास्त तापमान राहील.
याच कालावधीत किमान तापमानदेखील सामान्यपेक्षा जास्त राहील.
उत्तर आणि पूर्व द्विपकल्प, मध्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात उष्णतेची तीव्र लाट राहील.
एप्रिलमध्ये पूर्व आणि मध्य भारतातील बहुतेक भागांत सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही पाऊस चांगला राहील.
महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेचे दिवस जास्त राहतील.
एप्रिलमध्ये संपूर्ण देशभरात 39.2 टक्के इतका पाऊस पडेल. तो दीर्घकालीन सरासरीच्या 88 ते 112 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.