Indrayani ghat River
पुणे : आळंदीमध्ये इंद्रायणी नदीवर 1988 मध्ये घाटाचे काम सुरू केले होते. त्यासाठी अनेक राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी पुढाकार घेतला होता. आता हाच घाट सांडपाणी पाइपलाइनसाठी फोडण्यात आला. यामध्ये राजकारण झाले. आम्ही विनंती करूनही काम थांबले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून उत्तर मिळालेले नाही. आपले स्वकीयच कटकारस्थान करून घाट तोडत असल्याची खंत श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केली. तसेच घाट रात्री नियोजन करून तोडले गेले, हे दुर्दैवी असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले
एमआयटी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कराड बोलत होते. या वेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त डॉ. स्वाती कराड-चाटे, यशोधन साखरे महाराज, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एम. पठाण, एमआयटी डब्लूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डब्लूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये आणि माईर्सचे संचालक डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.
डॉ. कराड म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आळंदी येथे आले होते, तेव्हाही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र भेट झाली नाही. पत्रालाही उत्तर देण्यात आले नाही. आम्ही स्थानिक प्रशासनाला याबाबत विचारले, मात्र शासनाकडून काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. आम्ही यापूर्वी केलेली सांडपाण्याची वाहिनी असतानाही ही नवीन पाइपलाइन टाकण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. किमान आम्ही ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर तरी काम थांबवणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही.”
साखरे महाराज म्हणाले, “इंद्रायणी नदीवर घाट बांधत असताना कॉलम आणि बीम टाकण्यात आलेले आहेत, ज्यामुळे घाट अधिक मजबूत झाला. पाइपलाइनसाठी घाट तोडताना बीमला काही धक्का पोहोचला आहे का? हेदेखील बघावे लागणार आहे. सध्या त्याठिकाणी केवळ काँक्रीट टाकण्यात आलेले आहे. घाट तोडण्याच्या अगोदर डॉ. कराड यांना किमान विचारले असते तर घाटाचा आराखडा दाखवता आला असता. परंतु, प्रशासनाकडून तेवढी काळजी घेतली गेली नाही.”