मुद्रांक शुल्कात सुलभता आणि एकरूपता आणणे तसेच शासनाचा महसूल वाढावा यासाठी मुद्रांक आणि नोंदणी विभागाने विविध प्रकारच्या करारनाम्यांच्या शुल्कात वाढ केली आहे. त्यानुसार ही वाढ शंभरऐवजी पाचशे रुपयांपर्यंत केली आहे.
तसेच भागीदारी पत्र, न्यायनिवाडा, कार्यकंत्राट (वर्क ऑर्डर), खासगी करारनामा यासह इतर करारांमध्येही 0.2 ते 0.5 टक्के वाढ केली आहे. याबाबतचा अध्यादेश राज्यपालांच्या वतीने शासनाचे अप्पर सचिव राजेश कुमार यांनी जारी केला आहे.
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून शंभर रुपयांच्या मुद्रांकवर (स्टॅम्प) विविध प्रकारचे करारानामे होत असायचे. काळाच्या ओघात जमिनी, सदनिका यासह मालमत्तेच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. मात्र, मुद्रांक केवळ शंभर रुपयांचेच होते. यामुळे शासनाच्या महसूल वाढ होत नव्हती. ही बाब लक्षात घेऊन 100 रुपयांऐवजी 500 रुपयांपर्यंत मुद्रांक शुल्कात वाढ केली आहे.
कंपनी भागीदारी करारानामा करताना पूर्वी 50 लाख रुपयांच्या भागभांडवलावर 0.2 टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येत होते. आता मात्र भागभांडवलीच्या रकमेत 1 कोटीपर्यंत वाढ केली असून, त्यावर 0.3 टक्के मुद्रांक शुल्क आकारले आहे.
दोन पार्ट्या किंवा नागरिक यांच्यामध्ये असलेला दावा सामोपचाराने मिटल्यास त्यावरदेखील मुद्रांक शुल्क वाढविले आहे. त्यानुसार 50 लाख रुपयांच्या आतील रकमेवर 0.75 टक्के मुद्रांक शुल्क आकारले आहे.
तर पन्नास लाख ते पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक असलेल्या रकमेवर 0.5 टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात आले आहे. पाच कोटी रुपयांपुढील रकमेवर 0.25 टक्के एवढे मुद्रांक शुल्क वाढविले आहे.