

येरवडा: नगर रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारा उर्वरित 25 टक्के बीआरटी मार्ग हटविण्याची मागणी आमदार बापूसाहेब पठारे यांनी विधासभा अधिवेशनात केली. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत त्यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न मांडले.
बीआरटी मार्गामुळे या भागातील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बीआरटीमधील नियोजनाच्या त्रुटींमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने उर्वरित बीआरटी मार्ग त्वरित हटविणे गरजेचे असल्याचे पठारे यांनी अधिवेशनात सांगितले.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र महापालिकेच्या ताब्यात द्यावीत, ससूनच्या धर्तीवर उभारण्यात आलेले लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू व्हावे, त्यात आणखी दोन मजले वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, खराडी-मांजरी-कोलवडी खुर्द-श्रीक्षेत्र थेऊर या नवीन मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा तसेच श्रीक्षेत्र लोहगाव-निरगुडी येथून श्रीक्षेत्र आळंदीला जोडणारा रस्ता करावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
ग्रामीण भागातील महिलांसाठी चर्चेसाठी अस्मिता भवनसारखे हॉल तसेच सांस्कृतिक भवन बांधणे गरजेचे आहे. ताथवडे येथे असलेल्या 100 एकर सरकारी जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहाच्या धर्तीवर विश्रामगृह उभारावे, अशी मागणीही पठारे यांनी केली.