रायगडावरील वाघ्या श्वानाच्या स्मारकाची सुरक्षा वाढवा
स्पर्धा परिक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांकडे जाईन
वाघ्याच्या स्मारकाप्रती संभाजी ब्रिगेडची दुटप्पी भुमिका
Gopichand padalkar on sharad pawar पुणे : संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघ केवळ ब्राह्मण द्वेषापोटी नवनवीन वाद उकरून काढतात. अडीचशे रुपयाचे जाकीट घालून नवनवीन इतिहास अभ्यासक येतात आणि शरद पवारांना अनुकूल अशी भूमिका मांडतात. शरद पवारांच्या पक्षातील लोक अजित पवारांच्या पक्षात असल्याने त्यांना फावला वेळ भरपूर आहे. माझी शरद पवारांना विनंती आहे, त्यांनी इतर इतिहास अभ्यासक पुढे करण्यापेक्षा स्वत:च इतिहास लिहावा आणि त्यांना ज्या जातीची, समाजाची माती करायची आहे ती करावी, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
रायगडावरील वाघ्या श्वानाच्या वादावर बोलताना पडळकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासामध्ये होळकर घराण्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे होळकरांच्या पुढाकाराने रायगडावर उभारलेल्या वाघ्या श्वानाच्या कबरीप्रति धनगर समाजाची आस्था आहे. संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाचे लोक ब्राह्मण समाजाला लक्ष करण्यासाठी जाणून बुजून वाद उकरून काढतात. जात पाहून इतिहास काढण्याची पद्धत 2014 पासून सुरू झाली आहे. वाघ्याचा पुतळा हटवा म्हणणारे संभाजी ब्रिगेड संभाजी महाराजांची हत्या करणार्या औरंगजेबच्या कबरीवर काहीच बोलत नाही. ही त्याची दुटप्पी भुमिका योग्य नसल्याची टिका पडळकर यांनी यावेळी केली.
खासदार छत्रपती उदयनराजे यांनीही वाघ्याच्या स्मारकास विरोध केला आहे. तेही शरद पवारांना अनुकूल भूमिका घेत आहेत का, या प्रश्नावर मात्र पडळकर यांनी सावध भूमिका मांडली. ते म्हणाले, उदयनराजे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. याबाबत सामंजस्याने भूमिका घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठरले आहे. सरकारने वाघ्याच्या स्मारकाची सुरक्षा वाढवावी आणि इतिहास अभ्यास संजय सोनावणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, अशी मागणीही आ. पडळकर यांनी केली.
एमपीएससी करणार्या विद्यार्थ्यांचा प्रश्न तुम्ही सोडला का याबाबत विचारले असताना पडळकर म्हणाले, मी एमपीएससी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडलेला नाही. या विद्यार्थ्यांमध्ये नवीन पुढारी तयार झाले आहेत. ते माझ्याकडे आले तर मी त्यांना घेवून मुख्यमंत्र्यांकडे जाईन, आणि त्यांचा प्रश्न सोडवीन. मात्र, नवीन पुढारी क्लासेस चालवणार्याच्या इशार्यावर काम करतात. त्यामुळे सरकारने यासंदर्भात एक धोरण करणे गरजेचे आहे.