मागील काही वर्षांत पादचार्यांच्या अंगावरील सोने तसेच हातातील मौल्यवान वस्तू ओढून नेण्याचे प्रमाण वाढू लागले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांची पायी गस्त सुरू करण्यात आली. तसेच, कोम्बिंग, अचानक नाकाबंदी करून सराईतांची पोलिसांनी कोंडी केली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यात आली. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत जबरी चोरीच्या घटनेत 105 ने घट झाली आहे. मागील वर्षी जबरी चोरीचे 391 गुन्हे दाखल आहेत. तर, यंदा 286 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने सोनसाखळी चोरांची मुस्कटदाबी करण्यात पोलिसांना चांगले यश मिळाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी 119 जणांच्या गळ्यातील सोने हिसकावण्यात आले होते. तर, यंदा केवळ 74 घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये देखील 45 ने घट झाली आहे.