

पुणे: सध्या विद्यार्थिनींच्या बाबतीत घडत असलेल्या अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींना 1 फेबुवारीपासून स्वसंरक्षण आणि सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बालगंधर्व रंगमंदिरात केली.
तसेच बालभारतीने स्वतःला अद्ययावत ठेवले आहे. विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहण्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित (एआय) शिक्षण साधने, कृषी, आरोग्य, क्रीडा, अध्यात्म अशा विषय घेऊन सुसंस्कृत पिढी घडवण्याचे काम पाठ्यपुस्तकांतून केले जाणार आहे. त्यामुळे राज्याला पुढे जाण्यात ‘बालभारती’चा वाटा असणार आहे, असे मत भुसे यांनी व्यक्त केले.
बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात भुसे बोलत होते. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, योजना संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण सहसंचालक डॉ. रमाकांत काठमोरे, माध्यमिक शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे, बाल बालभारतीच्या वित्त व लेखाधिकारी शुभांगी माने, सुकाणू समितीचे सदस्य डॉ. श्रीपाद ढेकणे, कवी-गीतकार दासू वैद्य, किरण केंद्रे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बालभारतीतर्फे चार पुस्तके, किशोर मासिकाच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
काळानुसार होणारे बदल स्वीकारत बालभारती पाठ्यपुस्तकांतून नवी पिढी घडवत आहे. अनेक मासिके बंद पडत असताना ‘किशोर’ मासिक आजही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे, असे पवार यांनी सांगितले, तर पूर्वीच्या दिग्गजांनी मोठे काम करून ठेवले आहे. हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे, असे ओक यांनी प्रास्ताविकात नमूद केले.
शिक्षण राज्यमंत्र्यांची दांडी तर शालेय शिक्षण मंत्री दोन तास उशिरा
बालभारतीच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाला शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयार यांनी चक्क दांडी मारली तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे चक्क दोन तास उशिरा म्हणजे साधारण 5 वाजून 20 मिनिटांनी येणे अपेक्षित असताना साडे सात वाजता आले. त्यामुळे 4 वाजल्यापासून आलेल्या विद्यार्थी तसेच शिक्षकांना रात्री साडे आठ वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले तर अधिकाऱ्यांना देखील मान्यवरांच्या मनोगतानंतर असणारा बालभारती कवितांचा सांगितिक आविष्कार हा कार्यक्रम सुरुवातीला घ्यावा लागला. त्यामुळे कार्यक्रम सुरू होऊन दोन तासांनी दीप प्रज्वलन शिक्षण मंत्री आल्यावर करावे लागले.
कवायत संचलनाचा विश्वविक्रम
राज्यातील 2 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी, 1 लाखापेक्षा जास्त शाळा, 7.5 लाखांपेक्षा जास्त शिक्षकांच्या सहभागातून प्रजासत्ताक दिनी कवायत संचलन कार्यक्रम झाला. त्याचा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. विद्यार्थी, शिक्षक, अधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे हा उपक्रम साध्य झाला, असेही भुसे यांनी सांगितले. पहिलीचे नवे पाठ्यपुस्तक लागू झाले. दुसरी, तिसरी, चौथी, सहावी या इयत्तांची नवी पुस्तके पुढील वर्षी लागू होणार आहेत, असे राहुल रेखावार यांनी सांगितले.