सासवड: पुरंदरमध्ये कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, तालुक्यातील धरणांचा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. किल्ले पुरंदर परिसरातील सुपे हद्दीतील घोरवडी धरणामध्ये सध्या 42 टक्के पाणी शिल्लक आहे, अशी माहिती गराडे पाटबंधारे शाखा अभियंता अविनाश जगताप यांनी दिली.
धरणाची एकूण साठवण क्षमता 67.50 दशलक्ष घनफूट इतकी आहे. धरणातून सासवड शहरासह सुपे-घोरवडी, शिवतारेवस्ती, चव्हाणवस्ती, पिंपळे, पोमणनगर, दातेमळा या ठिकाणी पाणीपुरवठा योजना सुरू आहे. या धरणावर परिसरातील 55 हेक्टर इतके क्षेत्र सिंचित होते. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने मार्चअखेरपर्यंत धरणामध्ये अल्प प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होता.
मागील वर्षाच्या तुलनेत गेल्या पावसाळ्यात धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने सध्या धरणात 42 टक्के पाणी शिल्लक असल्याचे सासवड पाटबंधारे शाखेचे संदेशक एस. एच. कोरपडे यांनी सांगितले. तसेच सासवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, असे सासवड नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी यांनी सांगितले.
धरणातून शेतकर्यांना उचल परवान्याची मुदत दि. 28 फेब्रुवारीला संपली आहे. पूर्णपणे पाणी उपसा बंद झाला, तरच या परिसरातील गावांना पाणी मिळेल, अन्यथा मृत साठ्यावर अवलंबून राहावे लागेल.
सासवड नगरपरिषदेला जून 2024 पासून 24 तास पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती घोरवडी जलाशय पाणीपुरवठा समिती अध्यक्ष विश्वास काटकर यांनी दिली. पाण्याच्या टंचाईबाबत परिस्थिती लक्षात घेत नागरिकांनी पाण्याची काटकसर करावी आणि सासवड नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.