

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा जीबीएस संदर्भात पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. महापालिका सर्व यंत्रणांसह समन्वयाने काम करत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी मात्र घाबरू नये, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केले.
गेले काही दिवस पुण्यात जीबीएसचा प्रभाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, जीबीएस बाधित रुग्णांना शहरी गरीब योजनेसह राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातूनही मदत करण्यात येईल. दरम्यान, पुण्यात केंद्रीय पथक येऊन गेले आहे. पथकाने काही ठिकाणी भेटी दिल्या आहेत. नागरिकांनी पाणी पिताना योग्य काळजी घ्यावी. जीबीएसचा अधिक प्रसार होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असेही मोहोळ म्हणाले.