

पुणे: मोफत मेट्रो आणि पीएमपीएमएल प्रवास योजना चांगली असली तरी तिची अंमलबजावणी करण्यासाठी महायुती सरकारला हा एकत्रित निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या मित्रपक्षांना विश्वासात न घेता अशा फसव्या घोषणा करू नयेत, अशी अपेक्षा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पुणेकरांसाठी मोफत मेट्रो आणि पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग््रेासचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याचा आणि नागरिकांचा प्रवास सुलभ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
यावर पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले “कोणताही एक नेता स्वतंत्रपणे अशा प्रकारच्या घोषणा करू शकत नाही. मेट्रो आणि पीएमपीएमएलबसमध्ये मोफत प्रवास देण्याची घोषणा करताना त्यासंदर्भातील आर्थिक तरतूद आणि अंमलबजावणी याची ठराविक प्रक्रिया असते. अशा घोषणा ही सामूहिक जबाबदारी असते.” पीएमपीएमएल बससेवा सध्या तोट्यात असून, पुण्याचा पालकमंत्री असताना बससेवेचा सुमारे एक हजार कोटी रुपयांचा तोटा होता. अद्याप एमएनजीएलचे 65 कोटी रुपये थकित असताना मोफत बस योजना कशी राबवणार? त्यासाठी राज्य सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे. हा निर्णय महायुती सरकारलाच घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले.
केवळ एक बटण दाबून मोफत बस योजना लागू होऊ शकत नाही. महायुती हे तिघांचे सरकार आहे, असे सांगून पाटील म्हणाले, “यापूर्वी 1999 ला अजित पवार यांनी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. सरकार आल्यानंतर ती ‘प्रिंटिंग मिस्टेक’ असल्याचा बचाव त्यांनी केला होता. असाच प्रकार या घोषणेबाबतही होण्याची दाट शक्यता आहे.” महिलांना उच्च शिक्षणासाठी 50 टक्के शुल्क माफीचा निर्णय घेण्यासाठी अजित पवार यांनी सहा महिने विलंब केला होता. राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याची त्यांची भूमिका होती. अखेरीस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर तो निर्णय घेण्यात आला. अशी भूमिका असलेले अजित पवार हे केवळ महापालिका निवडणुकीच्या तोंडावर करत असलेल्या घोषणा आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत, असेही पाटील म्हणाले. मुख्यमंत्रीपदाकडे संपूर्ण राज्याचे अधिकार असतात. उपमुख्यमंत्री पद हे कायदेशीररित्या अस्तित्वात नसते. एकच मुख्यमंत्री आणि बाकी सर्व मंत्री असतात. मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो, असे पाटील यांनी सांगितले.
मायक्रोप्लॅनिंगमुळे जागा 125 पर्यंत!
पुणे महानगरपालिका निवडणुकीत अंतर्गत सर्व्हेनुसार भाजपाला सध्या 115 जागा मिळत आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या मायक्रोप्लॅनिंगमुळे हा आकडा 125 पर्यंत जाईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. निवडणुकीनंतर पुण्यात भाजपचाच महापौर होईल आणि त्या पदासाठीची विविध प्रवर्गानुसार नावेही अंतिम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.