

इंदापूर : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग ५ व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या २५ वर्षात सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि. १३) सर्व २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन १९९९ मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत. नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या २५ वर्षांमध्ये शेतकर्यांचा विश्वास संपादन केलेला आहे, तसेच सध्या देशातील व राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत असल्याची जाण शेतकऱ्यांना आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील ४६ गावांमधील सभासद व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीकरिता सहकार्याची भूमिका घेतली, त्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.
•बावडा गट :-पाटील हर्षवर्धन शहाजीराव, पाटील प्रतापराव सर्जेराव, पाटील उमेश अच्युतराव
•पिंपरी गट:- मोहिते प्रकाश शहाजी, बोडके संजय तुळशीराम, विजय दत्तात्रय घोगरे.
•सुरवड गट:- शिर्के महेशकुमार दत्तात्रय, घोगरे दादासो उत्तम, गायकवाड सुभाष किसन
•काटी गट :- पवार लालासो देविदास, जाधव राजकुमार वसंतराव, वाघमोडे विलास रामचंद्र
•रेडणी गट :- बोंद्रे आनंदराव नामदेव, देवकर राजेंद्र व्यंकट, सवासे दत्तू यशवंत
•अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्ग:- कांबळे राहुल अरुण
•इतर मागास प्रवर्ग:- यादव कृष्णाजी दशरथ
•भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग:- नाईक रामचंद्र नामदेव
•ब वर्ग सभासद प्रवर्ग :- पाटील भाग्यश्री हर्षवर्धन
•महिला राखीव प्रवर्ग:- पोळ संगिता दत्तात्रय, शिंदे कल्पना निवृत्ती
कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणेसाठी विद्यमान संचालक उदयसिंह पाटील यांनी बावडा गटातून स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय हा तहसील कार्यालयामध्येच शेवटच्या दोन मिनिटात घेतला. त्यामुळे हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील यांना तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु उदयसिंह पाटील यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आपला निर्णय कायम ठेवला. त्यानंतर भाग्यश्री बंगल्यावर कार्यकर्त्यांसमोर बोलताना उदयसिंह पाटील यांनी सांगितले की, सध्या आपले नेते हर्षवर्धन पाटील (भाऊ) हे विधानसभा निवडणुकीतील अपयशाने राजकीय पदावर नाहीत.
त्यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध होणे हे राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या प्रतिष्ठितेसाठी आवश्यक होते. भाऊच्या राजकीय अडचणीच्या काळात तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी पदासाठी वेळप्रसंगी नाराज न होता एक पाऊल मागे घेण्याची गरज आहे, असे उदयसिंह पाटील यांनी सांगितले. यावेळी बोलताना अँड.कृष्णाजी यादव यांच्या डोळ्यातून उदयसिंह पाटील यांनी दाखविलेल्या मनाच्या मोठेपणाबद्दल अश्रू आले. याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की कोणाचेही अडचणीचे राजकीय दिवस कायम राहत नसतात. कारखान्याच्या पहिल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये उदयसिंह पाटील यांना तज्ञ संचालक म्हणून यावेळी घेतले जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
कारखान्याच्या सन १९९९च्या स्थापनेपासून झालेल्या सर्व ५ ही पंचवार्षिक निवडणूका बिनविरोध होणारा निरा भिमा सहकारी साखर कारखाना हा राज्यातील एकमेव साखर कारखाना ठरला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे या कारखान्याचे संस्थापक आहेत. या सर्व ५ही पंचवार्षिक निवडणुका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली बिनविरोध झाल्या आहेत.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे व त्यांना सहाय्यक म्हणून इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी काम पहिले.