

आशिष देशमुख
पुणे : देशात अन् महाराष्ट्रात सर्वच ऋतूंमध्ये उष्णतामान वाढत आहे. याचा परिणाम देशातील गर्भवती स्त्रियांच्या आरोग्यावर गंभीररीत्या होत आहे. बाळाचे वजन कमी भरणे, लवकर प्रसूती होणे, बाळाचे वजन घटणे, असे परिणाम वाढत्या उष्णतेने होत असल्याचे निष्कर्ष संशोधकांनी काढले आहेत. भारतातील गरोदरपणाच्या काळात (प्रसूतिपूर्व) महिलांमध्ये होणाऱ्या उष्णतेशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेची सखोल माहिती मिळविण्यासाठी ‘हीट इन प्रेग्नन्सी प्रोजेक्ट’ (एचआयपी-1) ही योजना देशातील काही राज्यांत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविली जात आहे. यात सुमारे ६०० गर्भवती महिलांची निरीक्षणे नोंदली असून, ती गंभीर आहेत.
भारत आणि ब्रिटन या देशांतील संशोधक संस्थांनी हा प्रकल्प हाती घेतला आहे. ख्रिस मारी कुरिअन, कार्तिक कुमार, डायना थॉमस, योगेश जैन, सुधाकर रेड्डी, बुला गॅब्रिला, डी जेसस, सिपिरियानो फ्लोरेस, सूर्या सुरेंद्रन, प्रकृती दयाल, श्रीवाटसन राघवन, मुदिता गोसैन, रामचंद्रन ठिरुवेंगदम, आर्या थोनिकुंड, सतीश कुमार, स्टेलीन प्रभाकरन, विद्या वेणुगोपाल, नित्या वाधवा, शिंजिनी भटनागर, देवकी नंबियार, जाने हिर्स्ट, डी प्रवीण या प्रमुख शास्त्रज्ञांनी या शोधनिबंधात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पुणे विभागातील उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर हीप इंडिया निष्कर्ष विशेष महत्त्वाचे मानले जात आहेत.
‘ही’ आहेत गंभीर निरीक्षणे
हवामान बदलामुळे दक्षिण आशियामध्ये उष्णतेच्या लाटांची (हीट व्हेव) वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे. ज्याचा सर्वाधिक आणि विषम परिणाम संवेदनशील लोकसंख्येवर होत आहे.
शारीरिक बदलांमुळे, लिंग-आधारित सामाजिक जबाबदाऱ्यांमुळे आणि उष्णतेशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक संसाधनांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे महिलांच्या आरोग्याचे गंभीर परिणाम होत आहेत.
तीन ठिकाणी प्रथदर्शी प्रकल्प
हीट इन प्रेग्नन्सी (हिप) इंडिया प्रकल्पाचाच एक भाग असलेला हा गुणात्मक अभ्यास, हवामान बदलाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या गुरुग्राम (हरियाणा), बिलासपूर (छत्तीसगड) आणि पुद्दुचेरी या तीन ठिकाणी प्रथम राबविला जात आहे.
सामाजिक-पर्यावरणीय आराखड्याचे (सोशिओ इकॉलॉजिकल फ्रेमवर्क) मार्गदर्शन घेऊन गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांच्या सखोल मुलाखती घेतल्या जात आहेत.