

पुणे : राज्यातील बहुतांश भागात २० जुलैपर्यंत पावसाचा अंदाज नाही. फक्त कोकणात १६ ते १८ जुलैदरम्यान पाऊस पुन्हा सुरू होणार असून, तेथे मुसळधारेचा अंदाज देण्यात आला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यानंतर राज्यात २० जुलैपर्यंत मोठा पाऊस नाही. कारण हवेचे दाब राज्यात वाढलेले आहेत. त्यामुळे मान्सून पुन्हा सुप्त स्थितीत गेला आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. मात्र, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज नाही. कोकणात १६ ते १८ जुलैदरम्यान मुसळधारेचा अंदाज देण्यात आला आहे.
यंदा ‘अल निनो’मुळे पाऊस कमी होणार, अशी भाकिते काही शास्त्रज्ञांनी वर्तविली होती. मात्र, १ ते ९ जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावत या भाकितांना छेद दिला. तसाच आणखी एक अंदाज तज्ज्ञांनी दिला आहे, तो भारतीय समुद्री स्थिरांकावर आधारित आहे. इंडियन ओशियन डायपोल (आयओडी) म्हणजेच भारतीय समुद्री स्थिरांक हा महत्त्वाचा घटक ‘अल निनो’चा प्रभाव कमी करून भारतीय उपखंडात पाऊस देऊ शकतो, असा अंदाज अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी दिला आहे. हा ‘आयओडी’ जुलैअखेर अंशतः, तर ऑगस्टपासून जोरदार सक्रिय होण्याची शक्यता आहे.